Yashasvi Jaiswal Biography in Marathi : भारताच्या कसोटी क्रिकेट टीममध्ये सध्या एक उदयोन्मुख खेळाडू प्रचंड गाजतोय, त्याचं नाव यशस्वी जैस्वाल ! भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मागील चार सामन्यांमध्ये सलग दोन द्विशतकांसह 655 धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरूध्दच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सलग दोन कसोटीत द्विशतके केली आणि सर्वात कमी वयाचा द्विशतक ठोकणारा खेळाडू ठरला. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. यशस्वीचा पाणीपुरी विकण्यापासून, तंबूत राहणे ते भारतीय संघाचा प्रमुख सलामीचा फलंदाज होणं हा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास या बातमीतून जाणून घेऊया…
कधी रस्त्यावर पाणीपूरी विकली तर कधी तंबूत काढली रात्र…
भारतासाठी सात कसोटी सामने खेळलेल्या जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal ) जन्म उत्तर प्रदेशातील भदोही येथे झाला. वडील छोटे दुकान चालवतात आणि आई गृहिणी आहे. यशस्वी हा त्यांच्या कुटुंबातील धाकटा मुलगा. मात्र, क्रिकेटवरील प्रेमापोटी त्याने वयाच्या 10 व्या वर्षी मुंबई गाठली. येथे त्याला काही वर्षे अज्ञाताचे जीवन जगावे लागले. त्यावेळी या स्वप्ननगरीत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती.
यशस्वी जैस्वालला ( Yashasvi Jaiswal ) मुंबईत आल्यानंतर राहण्यात खूप अडचणी आल्या कारण त्यांच्याकडे घर नव्हते. यशस्वीचे फक्त एक काका मुंबईत राहत होते, पण त्यांचे घर खूपच लहान होते. ते त्याला तिथे ठेवू शकले नाहीत, म्हणून त्यांनी यशस्वीला काळबादेवी नावाच्या डेअरीत नोकरी मिळवून दिली जिथे त्याची राहण्याची देखील सोय होती. डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं. यशस्वीनं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची ( Yashasvi Jaiswal ) क्रिकेट कारकिर्द आणि स्वप्न तेथेच संपुष्टात आले असते.
त्यानंतर त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला ( Yashasvi Jaiswal ) क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेड क्लबच्या ग्राऊंड्समनच्या तंबूत झोपू लागला. तो तंबूत रात्र काढायचा आणि दिवसा सराव करायचा.
त्याचे वडील मुंबईला त्याला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे त्या काळात पोटापाण्यासाठी पाणीपूरी विकत असे. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही. क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
तीन वर्षांच्या संघर्षानंतर, जयस्वालची प्रतिभा क्रिकेट प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी ओळखली, ज्यांनी त्याला राहण्यासाठी जागा दिली आणि ते त्याचे पालक आणि मार्गदर्शक बनले. त्याने यशस्वीला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केले. ज्वाला सिंग यांनी दिलेल्या या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला आणि मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात करत क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली.
2015 मध्ये यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा तिने गिल्स शील्ड सामन्यात नाबाद 319 धावा करून आपले नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले. यानंतर जैस्वालने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याची मुंबई अंडर-16 संघात निवड झाली आणि त्यानंतर भारताच्या अंडर-19 संघातही त्याला स्थान मिळाले.जैस्वालच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत राहिल्याने 2018 च्या ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली, जी भारताने जिंकली आणि त्यावेळी त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड झाली होती.
यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) 7 जानेवारी 2019 रोजी रणजी करंडक स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि 20 धावा केल्या. यानंतर, 28 सप्टेंबर 2019 रोजी, यशस्वीने विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईसाठी लिस्ट ए क्रिकेटमधून पदार्पण केले. 2019 मध्ये, वयाच्या 17 व्या वर्षी, यशस्वी जयस्वाल विजय हजारे करंडक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला.
जैस्वालच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याला 2020 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. जैस्वालनेही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 105 धावांची नाबाद खेळी खेळून भारताचे नेतृत्व केले. या स्पर्धेत, त्याने अवघ्या सहा सामन्यांमध्ये 400 धावा करून भारताला अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली, ज्यामुळे भारतीय क्रिकेट जगतात त्याची लोकप्रियता आणखीच वाढली.
मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाल्यावर यशस्वी जैस्वालच्या ( Yashasvi Jaiswal ) अहोरात्र मेहनतीचे फळ मिळाले. 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये या युवा फलंदाजाने 12 शतके आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 2706 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 32 लिस्ट ए सामन्यात 1511 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर पाच शतके आणि सात अर्धशतके आहेत.
यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) आपल्या याच सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीने आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले. 2020 च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने जयस्वालला 2.4 कोटी रुपयांना विकत घेतले, जे त्याच्या मूळ किमतीच्या 12 पट होते. त्याने 22 सप्टेंबर 2020 रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल पदार्पण केले.जयस्वालने त्या मोसमात फक्त तीन सामने खेळले आणि 40 धावा केल्या. पुढच्या सीझन 2021 IPL मध्ये त्याने आपला खेळ सुधारला आणि 10 सामन्यात 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या पण पुढच्या वर्षी त्याचे नशीब बदलले.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने अनकॅप्ड खेळाडू यशस्वी जैस्वालला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. 2022 च्या हंगामात, जैस्वालने 10 सामन्यांमध्ये 25.80 च्या सरासरीने 258 धावा केल्या. रॉयल्सने जैस्वालला त्याच रकमेत IPL 2023 मध्ये कायम ठेवले. 2023 च्या मोसमात त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध IPL मध्ये पहिले शतक झळकावले. जैस्वालने 2023 IPL मध्ये 14 सामन्यात 625 धावा केल्या. जयस्वालने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आणि लवकरच त्याला भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली.
जुलै 2023 मध्ये, यशस्वी जयस्वालची ( Yashasvi Jaiswal ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय संघात निवड झाली. 12 जुलै 2023 रोजी, जयस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी डावात शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 171 धावांची शानदार खेळी करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. या सामन्यात त्यानं 1 शतके आणि एक अर्धशतक झळकावले. यानंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. लवकरच त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
तीन कसोटी सामन्यांमध्ये विशेष विक्रम
आता जैस्वाल पुन्हा एकदा सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. कारण सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या या मालिकेत यशस्वीने सलग दोन कसोटीत द्विशतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत विनोद कांबळी आणि विराट कोहलीची बरोबरी केली. याशिवाय त्याने एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा महान खेळाडू वसीम अक्रमची बरोबरी केली आहे. अक्रमने 1996 मध्ये शेखुपुरा (पाकिस्तान) येथे झिम्बाब्वेविरुद्ध 12 षटकार ठोकले होते.
यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) यांचे बालपण गरिबीत गेले असले तरी, संघर्षमय प्रवासानंतर आज तो मेहनतीच्या बळावर करोडो रूपयाचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जैस्वाल याची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 4 कोटी रुपये आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न सुमारे 35 लाख रुपये आहे. यशस्वीने आतापर्यंत केवळ आयपीएलमधून 12 कोटी रुपये कमावले आहेत.
यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) जाहिरातींमधूनही चांगले पैसे कमावतो. अलीकडेच तो आपल्या कुटुंबासाठी मुंबईला शिफ्ट झाला आहे. ठाण्यात त्यानं 5 BHK फ्लॅट घेतला आहे, ज्याची किंमत कोट्यावधी आहे. अशाप्रकारे आपल्या समर्पण आणि मेहनतीने त्याने क्रिकेट शिकले आणि आपले स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण केले.