नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतातील सर्वात जास्त प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान पहिल्याच दिवशी जवळपास 100 टक्के भरलेले होते. टी-20 क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटकडे वळण्याची इच्छा नसलेल्या प्रेक्षकांनाही कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानावर आणण्यात यश मिळाले ही कसोटी क्रिकेटसाठी सकारात्मक बाब ठरत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा ठोकल्या आहेत. आता भारतीय फलंदाजांची पाळी आहे. भारतीय संघाला 74 धावांवर पहिला धक्का बसला आहे.
संघाचा कर्णधार रोहित शर्माला 35 धावा करून मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं आहे. मॅथ्यू कुहनेमनने रोहितला आपल्या जाळ्यात अडकवल्याचं यावेळी दिसून आलं. यावेळी रोहितला 58 चेंडूत 35 धावा करता आल्या. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.