लोणावळा – लोणावळा बाजारपेठेत दैनंदिन होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येने नागरिक त्रस्त झालेले असताना पोलीस व नगरपरिषद प्रशासन मात्र सुस्त बसले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक व लोणावळा नगरपरिषद इमारतीला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. अशी परिस्थिती असताना कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत.
मागील काही दिवसांमध्ये लोणावळा शहरात अतिक्रमणांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. कुमार चौक ते भांगरवाडी डफळ बिल्डिंगपर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजुला फळविक्रेत्यांच्या हातगाड्या व भाजीची दुकाने उभी राहिली आहेत. दुकानदारांनी देखील दुकाने वाढवत थेट रस्त्यावर दुकाने मांडली आहेत. हे सर्व डोळ्यासमोर होत असताना लोणावळा नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग व लोणावळा शहर पोलीस केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याचे यामागचे गौडबंगाल नेमके काय असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.
काही राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधी यांनी देखील या अतिक्रमणांच्या विरोधात प्रशासनाकडे आवाज उठवत कारवाईची मागणी केली; मात्र कारवाई होत नसल्याने प्रशासनावर कोणाचा दबाव आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोणावळा नगरपरिषदेवर मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवट असताना देखील शहरात राजरोसपणे अतिक्रमणे उभी रहात आहेत. दररोज कोठेतरी नवीन टपरी हातगाडी, कंटेनरमधील दुकाने, पत्राशेड उभे रहात आहेत. लोणावळा नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग वरिष्ठ आदेश देत नसल्याचे कारण सांगत हातावर हात ठेवून बघ्याची भुमिका घेत आहे तर पोलीस प्रशासन आमच्याकडे पोलीस संख्याबळ कमी असल्याने नियोजन करता येत असल्याचे सांगत हातवर करत आहेत.
लोणावळा शहरातील वाहतूककोंडी नियोजनासाठी लोणावळा नगरपरिषदेत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये वाहतुकीचा शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस व नगरपरिषद प्रशासन यांना देण्यात आल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का? हाच मुळात कळीचा मुद्दा आहे. लोणावळा शहरातील वाहतूक नियोजनासाठी आतापर्यत अनेक सर्व्हे व बैठका झाल्या, आराखडे तयार केले गेले. लोणावळा नगरपरिषदेने ठराव करत शहरात वन वे, पार्किंग, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन तयार केले गेले; मात्र अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.तर शहरात लागू केलेली एकेरी वाहतूक गुंडाळावी लागली आहे.
नागरिकांचा विचार करा
शहाराच्या विकासासाठी कररुपाने महत्वाचा हातभार लावणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी मोकळे रस्ते, वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था कशी देता येईल याचा विचार करावा. अन्यथा काही दिवसांनी लोणावळा शहराची ओळख टपरी हातगाड्यांचे शहर अशी व्हायला फार वेळ लागणार नाही. लोणावळा नगरपरिषद प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी देखील राजकीय दबाव झुंगारत कारवाई मोहिम राबवत शहरातील रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करुन द्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.