शिरूर : राज्य सरकारने आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी राज्यातील दारूच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमीच्या लांबच लांब रांगा दुसऱ्या दिवशी सुरु होत्या. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे महिला वर्गांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. घरगुती हिंसाचार, आणि महिला वरील अत्याचार यांच्यात यामुळे वाढ होणार आहे.
कालपासून दारूची दुकाने सुरू झाली आणि मद्यप्रेमींनी दारूच्या दुकानावर एकच गर्दी केली. भर उन्हात माणूस उभा राहू शकत नाही. तिथे हे मद्यप्रेमी अगदी शिस्तीत उभे असल्याचे दिसून आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही तेवढीच लाईन दुकान सुरू झाल्यापासून पासून ते दुकान बंद होईपर्यंत सुरू होती.
परंतु दारूची दुकाने सुरु झाल्याने घरातील महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याची सूर महिला वर्गातून निघत आहे. गोरगरीब म्हणणारे, अन्नधान्य किट घेणारे, गरिबीची आव आणणार अनेक जण दारू घेण्यासाठी लाईन मध्ये दिसत होते.
रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या कि, अशा मद्यप्रेमींना मोफत अन्न, रेशन आणि इतर किट देऊ नये. जर दारू साठी पैसे असतील तर मग मोफत किराणा कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दारू पिऊन मद्यप्रेमी घरात पत्नी, मुलाशी भांडण करणार, त्यामुळे महिला अत्याचारात भर पडणार असं देखील त्या म्हणाल्या.
यावर महिला दक्षता समिती शिरूर अध्यक्षा शोभनाताई पाचंगे म्हणाल्या कि, शिरूर तालुक्यात वाईन शॉप सुरू झाले असून, यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये दारू पिऊन मद्यप्रेमी घरातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास देणार असून महिला अत्याचारात यामुळे वाढ होण्याची शक्यता असून, कौटुंबिक कलह वाढणार आहे.