नगर – ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा उन्हाळा कडक राहील. त्यामुळेच जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा अधिकच लांबण्याची शक्यता आहे.यामुळे जुलै ते ऑगस्टमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने वर्तविली आहे. यामुळे त्या दृष्टीने प्रशासनाने आता तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 6 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात आता वाढ झाली असून 9 टॅंकरद्वारे 9 गावे व 41 वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेने टंचाई निवारण्यासाठी साडेसात कोटींचा कृतिआराखडा तयार केला आहे. अर्थात हा आराखडा डिसेंबर महिन्यात झाला असून आता लांबणारा पाऊस लक्षात घेता पुन्हा टंचाईचा दुसरा आराखडा तयार करावा लागणार असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी आहे. परंतु वाढत्या उन्हामुळे आता या जलसाठ्यात घट होत आहे. त्यात पाऊस लांबणार असल्याचे सांगण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तापमानवाढीला काहीअंशी ब्रेक लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत असून 41 अंशांवर गेले. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावत आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आता बहुतांशी ठिकाणी पाण्याचे उद्भव कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
तीन तालुक्यात टॅंकर सुरू
सध्या संगमनेर, अकोले, व पारनेर या तीन तालुक्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संगमनेरमध्ये 7 गावे 19 वाड्यांना 6 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे 10 हजार 593 लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. अकोले तालुक्यात 1 गाव 10 वाड्यांना 2 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत असून 4 हजार 95 लोकांची तहान भागविण्यात येत आहे. पारनेर तालुक्यात 1 गाव 12 वाड्यांना 1 टॅंकर सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी 2 हजार 971 लोकांना पाणीपुरवठा होत आहे.