पेठ (वार्ताहर) – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाट्याचे बाजारभाव अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याने शेतकऱ्यांचे बटाटे रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. पेठ येथील बुट्टे वस्तीतील राम सिताराम बुट्टे या शेतकऱ्याच्या बटाटा अरणीतील 30 ते 35 पिशव्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला.
चोरीला गेलेल्या बटाट्याची किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपये असल्याची माहिती शेतकरी बुट्टे यांनी दिली. सध्या बटाट्याला प्रति 10 किलोस 320 ते 340/ 350 असा बाजार भाव मिळत आहे. सातगाव पठार भागात बटाट्याला कधी नव्हे इतका विक्रमी बाजारभाव वाढला आहे.
बुट्टे वस्ती येथील शेतकरी राम सीताराम बुट्टे यांचे वृध्द मातापिता हे आपले हक्काचे उदरनिर्वाहाचे पीक चोरीला गेले हे पाहून ढसा ढसा रडु लागले. किती कष्ट करून जपून ठेवलेले बटाटा पीक असे अचानक चोरीला गेल्याचे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचे बटाटे घरापासून दूर निर्मनुष्य ठिकाणी आहेत. त्यामुळे एका बाजूला विक्रमी बाजारभाव वाढला म्हणून आनंद, तर दुसरीकडे अरणीतील बटाटे रात्रीच्या वेळी चोरीला जात असल्याने भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य अशोक राक्षे यांनी बुट्टे वस्तीत जाऊन राम सिताराम बुट्टे यांचे व त्यांच्या मातापिता यांना आधार देत बटाटे चोरीला जाऊ लागल्या बाबत इतर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. असे आवाहन केले.