मुंबई – राज्यातील वायू प्रदूषणाबाबत बैठक घेण्यात आली. राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी घसरत असल्याचे अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पण बुधवारी रिमझिम पाऊस झाल्याने पुण्यातील काही भागात हवेची गुणवत्ता सुधारली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत पुणे महापालिकेकडून कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत. याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता, राज्य सरकारच्या गाईडलाइन्स आताच आल्या असून लवकरच उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दररोज मुंबईत सर्व प्रकारचे रस्ते धुण्यात यावेत असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसेच आवश्यक भासल्यास आणखी फॉगर वापरता येतील. जे जे आवश्यक आहे, मशिन्स लागणार असतील तर त्या वापरण्याचे आदेश संपूर्ण राज्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पर्यटन विभागाला देखील दररोज लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी जे जे करावे लागेल ते सगळे केले जाईल. प्रदूषण नियंत्रण ही पालिकेची जबाबदारी तर आहेच, पण ही एक लोक चळवळ झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
1 हजार पाण्याचे टॅंकर्स भाडे तत्त्वावर घेणार
अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर भर देण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. प्रदूषणाचे प्रमाण युद्ध पातळीवर कमी झाले पाहिजे यासाठीच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1 हजार पाण्याचे टॅंकर्स भाडे तत्त्वावर घेतले जाणार आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी स्मॉगगन आणि स्प्रिंकलर्स बसवण्याचे आदेश दिले गेले आहेत. हायकोर्टाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गलाईच्या कारखान्यावर कारवाई
मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. प्रदूषणाला कारणीभूत काळबादेवी, झवेरीबाजार, भुलेश्वर परिसरात सोने- चांदी गलाईच्या कारखाने आहेत. मात्र, पालिकेने सोमवारी (6 नोव्हेंबर) चार भट्ट्या व धुरांड्यांवर कारवाई करून ते हटविले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर सोने-चांदी गलाई व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.