मुंढवा- (मनोज गायकवाड) – पुणे महानगरपालिकेने केशवनगर-मुंढवा परिसराचा समावेश कचरा डेपो सुरू करण्यासाठी केला आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही अनेक नको असलेले प्रकल्प येथे महापालिकेने या भागावर लादले आहेत. त्यात आता कचरा डेपोची भर पडली आहे. या प्रकल्पाची कोणतीही पूर्व माहिती न देताच तो गुपचूप सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा गाड्यांची वर्दळ असते. बहुतांशी वेळा हा कचरा रस्त्यावर सांडतो तसेच दुर्गंधीही सुटते, पालिकेच्या या ढिसाळ कारभाराबाबत केशवनगर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
केशवनगर भागात कचरा प्रकल्प करण्यात आला आहे. केशवनगर-मुंढवा येथील जवळपास दोन लाख लोकसंख्या आहे. पुणे शहराच्या सर्व भागातून कचरा हा केशवनगर भागात आणला जात आहे. पुण्यातून मोठमोठे डंपर भरून कचरा केशवनगर भागात प्रमुख रस्त्यांनी दररोज 20 ते 25 डंपर येतात, त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिकेला नको असलेले सर्वच प्रकल्प केशवनगरमध्ये राबविले जात आहेत. म्हशीचे गोठे, कुत्र्यांची वसाहत, जॅक्वेल प्रोजेक्ट, कारकस प्रकल्प येथे आणण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत 2017 मध्ये नव्याने 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर केशवनगर भागामध्ये एखादा चांगला प्रकल्प येईल, अशी आशा होती. उर्वरित शासकीय जागा ही केशवनगरच्या विकासकामासाठी वापरली जाईल, अशी नागरिकांची आशा होती. परंतु, कचरा प्रकल्प लादून मुंढवा-केशवनगरवासीयांना वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले आहे.
केशवनगरकडे लक्ष द्यायला पालिकेकडे वेळ नाही. नको ते प्रकल्प केशवनगरलाच आणले गेले आहेत. शाळा, कॉलेज, पाण्याची टाकी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, क्रीडांगण, उद्यान यापैकी कोणतेही काम महानगरपालिकेकडून झालेले नाही. कचरा डेपो मात्र केशवनगर-मुंढव्याच्या माथी मारण्याचे काम केले आहे. येथे हा प्रकल्प सुरू करण्यात असल्याबाबत कोणताही माहिती पालिकेने नागरिकांना दिली नाही. या गोष्टीचा निषेध केशवनगरचे नागरिक सातत्याने करीत आहेत. सदर प्रकल्प बंद करण्यासाठी आंदोलन करणार आहोत.
– देवेंद्र भाट, शिवसेना शाखाप्रमुख
पुणे महानगरपालिकेच्या वतीने केशवनगरमध्ये कचरा प्रकल्प गुपचूप उभारले गेले आहेत. या कचरा प्रकल्पात पुणे शहराच्या सर्व भागातून कचरा केशवनगर भागात आणला जातो. त्यामुळे केशवनगर व मुंढवा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून ही बाब लक्षात घेत कचरा प्रकल्प त्वरीत बंद करावा, अन्यथा कचरा गाड्या अडविण्यासारखे प्रकार घडतील.
– डॉ. दादा कोद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य
महानगरपालिकेत समावेशानंतर केशवनगरचा विकास वेगाने होईल, असे नागरिकांना वाटत होते. परंतु, याउलट तक्रारी वाढत आहेत. याआधीच पालिकेने केशवनगरवर पुण्यातील म्हशींचे गोठे, कुंभारवाडा, कुत्र्यांची वसाहत आदी प्रकल्प लादले आहेत. केशवनगरच्या नागरिकांना मुबलक पाणी, सुस्थितीतील रस्ते, वीज, ड्रेनेज आदी कामे पालिकेकडून वेळेवर मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
– जितीन कांबळे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी पुणे शहर