वाघोली – वाघोलीचा महापालिकेत समावेश केला असल्याने भामा आसखेडचे पाणी वाघोलीला मिळाले पाहिजे, पाण्यासाठी आंदोलन उभे केले तर स्वतः आंदोलनात सहभागी होऊन पाणी मिळवून देऊ अशी घोषणा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाघोली येथे केली. यावेळी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. वाघोली गणेशनगर येथील प्रभू श्रीराम उद्यानाचे उद्घाटन संदीप सातव यांच्या क्विक रिस्पॉन्स टीम या मोफत सुविधेचे व वाहनाचे तसेच प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार बापू पठारे, भाजप नेते प्रदीप कंद, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, बाबाराजे जाधवराव, गणेश कुटे किरण दगडे, रोहिदास उंद्रे,संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, श्याम गावडे, स्वप्नील उंद्रे, अमोल शिवले, अनिल सातव पाटील, प्रदिप सातव पाटील वाघोली व हवेली परिसरातील भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त भाजप पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देखील उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले.
दरेकर बोलताना म्हणाले कि, २३ गावे महापालिकेत घेत असताना येथे नागरिकांना मुलभूत सोयी मिळाव्यात यासाठी स्वतंत्र निधी द्यावा असा आग्रह केला होता. आता भामाआसखेडचे पाणी देण्यावरून दोन स्थानिक आमदारांची विसंगत मते आहेत. वाघोलीला भामाआसखेडचे पाणी, सुविधा मिळाल्याच पाहिजे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये विकास कामांबाबत चाललेला श्रेयवाद, वाढती गुन्हेगारी व इतर राजकीय मुद्द्यांवर दरेकर यांनी सडकून टीका केली.
सातव यांच्या पक्ष निष्ठेची दखल..
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मुंबईमध्ये पोल-खोल अभियान चालू असताना संदीप सातव यांच्या लोकोपयोगी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याबाबत च्या सूचना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना केल्या असल्याचे दरेकर यांनी भाषणात आवर्जून उल्लेख करीत सांगितले. संदीप सातव यांच्या कार्याची दखल तसेच पक्षनिष्ठा याची चर्चा तालुका भर रंगू लागली आहे.