यात्रा 3 आठवड्यांऐवजी एकाच आठवड्यात होणार पूर्ण
नवी दिल्ली – कैलास मानसरोवर यात्रा आणि सीमा प्रांताला जोडणाऱ्या नवीन युगाचा आज आरंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका विशेष कार्यक्रमात उत्तराखंडमधील धारचुला आणि चीनच्या सीमारेषेजवळ लेपुलेख यांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन केले. पिठोरा गंज वरून गुंजीला जाणाऱ्या एका वाहनांच्या ताफ्यालाही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.
या महत्वाच्या रस्त्यामुळे स्थानिक लोकांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना बळ मिळाले असून यात्राही सुफळ संपूर्ण होतील असे राजनाथ सिंग यांनी नमूद केले. रस्त्ये सुरू झाल्यावर या भागातील स्थानिक व्यापार आणि आर्थिक विकास यांना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदू, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मियांना पवित्र असणारी कैलास-मानसरोवर यात्रा या रस्त्यामुळे दोन ते तीन आठवड्यात ऐवजी एकाच आठवड्यात पूर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले. घाटियाबगड वरून सुरू होणारा हा रस्ता लेपुलेख खिंडीपर्यंत जातो. सिक्कीम किंवा नेपाळ मार्गे कैलास-मानसरोवर ला जाणारे रस्ते हे लांबलचक असून तेथे उंचावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वृद्ध यात्रेकरूंना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या अडचणी या नवीन लेपालेख मार्गाने प्रवास करताना येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
सिक्कीम आणि नेपाळ वरून जाणारे दुसरे दोन मार्ग आहेत जिथून जाताना 20% प्रवास भारतीय हद्दीतून आणि 80 टक्के प्रवास चिनी हद्दीतून करावा लागतो. घाटीबागढ लेपालेख या मार्गामुळे आता 84 टक्के प्रवास हा भारतीय हद्दीतून तर 16 टक्के प्रवास चिनी हद्दीतून करावा लागेल. हे अभिमानास्पद असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.
सीमा रस्ते बांधणी दलाचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या कामाप्रती समर्पित वृत्तीचे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. कोविड-19 च्या या कठीण काळातही सीमा रस्तेबांधणी दलाचे कर्मचारी आपल्या कुटुंबियांपासून दूर दुर्गम भागात हे काम करतात असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद करत त्यांना शाबासकी दिली.
अतिशय विपरीत स्थितीतील आव्हानात्मक काम…
गेल्या काही वर्षात येणारे अचानक येणारे पूर आणि ढगफुटी याच्यामुळे प्रचंड नुकसान झाले. रस्त्याच्या सुरुवातीच्या 20 किलोमीटरच्या टप्प्यातल्या पर्वतांमध्ये अतिशय कठीण दगड होते आणि जवळपास उभे सुळके होते . ज्यामुळे सीमा रस्तेबांधणी दलाच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले, तर जवळपास पंचवीस उपकरणे काली नदीत कोसळून निरुपयोगी झाली. या सर्व अडचणींवर मात करत गेल्या दोन वर्षात सीमा रस्तेबांधणी दलाने अनेक पातळ्यांवर वेगाने काम करत आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर करत आपले काम जवळपास वीस पट अधिक क्षमतेने पूर्ण केले. या भागाच्या दुर्गमतेमुळे शेकडो टन माल किंवा यंत्र आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वरचेवर वापर करावा लागला.