मुंबई: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 च्या रुग्णांना डिस्चार्ज म्हणजेच रुग्णालयातून सुट्टी देण्याच्या धोरणात बदल केला आहे. या सुधारित धोरणाची कोविड-19 च्या त्रिस्तरीय व्यवस्थापन आणि उपचार व्यवस्थेशी सांगड घालण्यात आली असून रुग्णाची अवस्था किती गंभीर आहे, यानुसार त्याचे वर्गीकरण सौम्य, अति सौम्य असे करण्यात आले आहे
लक्षणे दिसण्यापूर्वीची अवस्था असलेल्या रुग्णांना कोविड केअर सुविधेत ठेवले जाईल आणि त्यांचा ताप तसेच नाडीपरीक्षण नियमित स्वरूपात केले जाईल. लक्षणांची सुरुवात झाल्यापासून 10 दिवसांनंतर आणि रुग्णाला सलग तीन दिवस ताप आला नाही, तर घरी सोडले जाऊ शकते. त्याला डिस्चार्ज देण्याआधी चाचणी करण्याची गरज नाही, ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, त्यांचीही डिस्चार्ज देण्यापूर्वी पुन्हा चाचणी करणे गरजेचे नसल्याचे, सुधारित धोरणात म्हटले आहे. त्यापुढे, डिस्चार्जवेळी, रुग्णाला गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाईल आणि सात दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्यासही सांगितले जाईल.
आधी रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी 24 तासांच्या कालावधीत दोनदा निगेटिव्ह आली तरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जात असे. मात्र, अनेक रुग्णांच्या बाबतीत असे आढळले की जे रुग्ण शारीरिकदृष्ट्या रुग्णालयातून सुट्टी देण्यास सक्षम आहेत, त्यांच्या केवळ आरटी-पीसीआर चाचण्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवून घेतले जात होते, असे आयसीएमआरच्या “साथीचे आणि संसर्गजन्य आजार’ विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.
“सार्स- सीओव्ही 2′ चा विषाणू व्यक्तीच्या घशातल्या स्नायूपेशींमध्ये असतो ज्याचा जीवनकाल तीन महिनेही असू शकतो. हा विषाणू या पेशींमध्ये निष्क्रिय झाला तरीही, तिथून व्यक्तीचे जे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेतले जातात, त्यात हा विषाणू आढळू शकतो. आरटी-पीसीआर चाचण्या केवळ विषाणू शरीरात अस्तित्वात आहे की नाही, हे बघण्यासाठी केली जाते आणि विषाणू शरीरात सक्रिय असो वा निष्क्रिय, तो या चाचणीत आढळतोच,’ असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.
जर व्यक्तीच्या तीन दिवस शरीरात ताप किंवा इतर काही लक्षणे नसतील, तर हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या शरीरात निष्क्रिय झाला असतो’, असेही त्यांनी पुढे सांगितले.
निष्क्रिय विषाणूमुळे आजाराची सुरुवात नाही…
या अभ्यासानुसार, आयसीएमआरने डिस्चार्ज धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जे नमुने स्वॅबमधून घेतले जातात, त्यांची सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी केली जाते. जर तीन दिवसांनंतर जर या नमुन्यातील विषाणूंची संख्या वाढत नसेल तर हा विषाणू निष्क्रिय झाला आहे, असे समजता येते. हा निष्क्रिय विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होऊ शकतो. मात्र, त्याच्यामुळे आजाराची सुरुवात होणार नाही. नव्या धोरणात, व्यक्तीला डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवस गृह अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.