फारुखाबाद – महाराष्ट्रात 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात आपल्याला आणि काही हिंदू नेत्यांना गोवण्याचा कट रचणाऱ्या कॉंग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. तुम्ही आज महाराष्ट्र एटीएसचा जबाब पाहिला असेल. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि इतर हिंदू नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये कशा प्रकारे अडकवण्याचे काम करण्यात आले होते, हे आता समोर आले आहे, असा दावा त्यांनी केला.
कॉंग्रेसचा खोडसाळपणा हा देशाविरोधातील गुन्हा असून त्याबद्दल कॉंग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. या बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने आपला जबाब बदलला आणि तत्कालीन वरिष्ठ एटीएस अधिकारी परमबीर सिंग आणि अन्य एका अधिकाऱ्याने उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इंद्रेश कुमारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार नेत्यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकला होता, असे साक्षीदाराने एनआयएच्या मुंबईतील एनआयएच्या कोर्टात सांगितले. यानंतर योगी यांची ही प्रतिक्रिया आली आहे. वसुली आणि इतर प्रकरणांचा सामना करणाऱ्या परमबीर सिंग यांना या महिन्यात निलंबित करण्यात आले होते.
दहशतवाद्यांना प्रवृत्त करणारी आणि पोसणारी कॉंग्रेस देशाशी कसा खेळ करते, हे कोणापासून लपून राहिलेले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी कॉंग्रेस सत्तेत असताना दहशतवाद्यांना प्रेरित आणि पोसत होती आणि हिंदू संघटनांवर खोटे गुन्हे दाखल करत होती. आणि आज सत्तेबाहेर असताना विकास आणि जनहिताच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करते, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.