नवी दिल्ली – पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राहुल गांधी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. त्याचा पहिला फटका बसलाय तो उत्तराखंडच्या कॉंग्रेस नेत्यांना. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे बहुतांश नेते आता रिटायरमेंटच्या वयात आहेत आणि त्यांना चिंता आहे ती त्याच्या मुलाबाळांची.
आताच्या विधानसभा निवडणुकीतही स्वत: आणि सोबत स्वत:च्या पोराबाळांना तिकीट देण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्रीपदाचे कॉंग्रेसचे दावेदार हरिश रावत यांचाही समावेश आहे. राहुल गांधींच्या निर्णयाचा त्यांनाही फटका बसताना दिसतोय.
पक्षात परिवारवादाला आळा घालण्यासाठी एक परिवार एक तिकीट असे धोरण त्यांनी लागू केले आहे. त्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून उत्तराखंडचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोंडियाल यांनी एकाच कुटुंबात अनेक तिकीट दिले जाऊ शकतात अशी वकिली केली होती.
त्याचा माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी विरोध केला होता. एकाच कुटुंबात तिकीट दिल्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना उपाध्याय यांनी बोलून दाखवली होती. तोच वाद कॉंग्रेस हायकमांडकडे गेला आणि शेवटी एक कुटुंब, एक तिकीट असं धोरण राबवण्याचे निश्चित केले गेले. विशेष म्हणजे कॉंग्रेसने याआधी असे धोरण पंजाबमध्ये राबवले होते. त्याचा फायदा कॉंग्रेसला झाला होता.