सर्पमित्र, प्रशासनाकडून जनजागृती गरजेची
शिक्रापूर – ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. परंतु सर्पांबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे सर्पदंश होण्याचे प्रकार घडत आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस योग्य उपचार मिळाल्यास जीवाचा धोका टळू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.
पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे अनेक सर्प जमिनीवर येतात. पाऊस गेल्यानंतर जमिनीचे तापमान वाढल्याने अनेक सर्प जमिनीवर सरपटत थंड व अंधाऱ्या जागेच्या शोधात घराजवळ येतात. नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अलीकडील काळामध्ये नागरिकांनी जंगले नष्ट करत कित्येक ठिकाणचे डोंगर सपाट केले आहेत. त्यामुळे सर्पांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
वाढत्या लोकवस्तीमुळे खाणे व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सर्प मनुष्यवस्तीत येत आहेत. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये सर्प पकडण्यासाठी सर्पमित्र कार्यरत झालेले आहेत. अनेकवेळा सर्पांची हत्या केली जात आहे.
केवळ हे सर्प विषारी की बिनविषारी हे समजू शकत नसल्यामुळे अनेकांना धोका निर्माण झाला आहे. परंतु याबाबत ग्रामीण भागात जनजागृती झाल्यास नागरिकांना संभाव्य धोके टळले जाणार आहे. त्यासाठी सर्पमित्र आणि आरोग्य विभागाकडून व्यापक प्रमाणात प्रबोधनाची चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी – टिळेकर
लहान सापांमध्ये जेवढे विष असते. तेवढेच विष मोठ्या सापांमध्ये असते. त्यामुळे नागरिकांनी कोठेही लहान अथवा मोठा सर्प दिसल्यास त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागातील नागरिकांनी रात्री बाहेर पडताना काळजी घ्यावी. कोठेही सर्प आढळल्यास जवळील सर्पमित्रांना बोलवावे.
रुग्णाला तातडीने उपचार द्यावेत – डॉ. काशीद
एखाद्या नागरिकाला सर्पदंश झाल्यास त्याचे पालक स्वतः घाबरून जातात. परंतु पालकांनी घाबरून न जाता सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर देत जवळील ग्रामीण रुग्णालयात हलविणे गरजेचे असते. असे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी सांगितले.