अहमदाबाद – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य मानल्या जात असलेल्या मुंबईचा पहिला डाव गुरुवारी पहिल्या दिवशी गोवा संघाने 163 धावांवर गुंडाळला. दिवसातील उर्वरीत खेळात गोवा संघाने आपल्या पहिल्या डावात 2 गडी गमावून 114 धावा केल्या असून ते अद्याप 49 धावांनी पिछाडीवर आहेत.
मुंबईचा प्रमुख फलंदाज अजिंक्य रहाणेला मात्र, या डावात खातेही उघडता आले नाही. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र, सर्फराज खान वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
सर्फराजने 63 धावांची खेळी केल्याने त्यांना दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारता आली. गोवा संघाच्या लक्ष्य गर्गने 6 तर, अमित यादवने 4 गडी बाद केले. गोवा संघाने पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात अमोघ सुनील देसाईच्या नाबाद 51 धावांच्या खेळीच्या जोरावर 2 बाद 114 धावा केल्या आहेत.