– रोहन मुजूमदार
पुणे – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली होती व दिलीप मोहितेंच्या विरोधात शिवसेनेकडून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच उमेदवार सुरेश गोरे उभे ठाकले व ते निवडून आल्याने खेडमध्ये परिवर्तन झाले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील दिग्गज मंडळी भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत; मात्र खेड तालुक्यात केवळ रामदास ठाकूर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत “घड्याळ’ हातात बांधले आहे. त्यामुळे खेडमधील राजकीय मंडळी आपापल्या पक्षाशी बांधून असले तरी ही मंडळी कोणाविरोधात षड्यंत्र रचणार अन् कोण बंडखोरी करणार हे पक्षांचे अधिकृत उमेदवार “जाहीर’ झाल्यानंतर समजेलच; मात्र तोपर्यंत “वेड अँड वॉच’ची भूमिका पार पाडावी लागणार.
2014च्या विधानसभा निवडणुकीत बुट्टे पाटील भाजपात तर सुरेश गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत दिलीप मोहिते यांच्या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठवत राष्ट्रवादी पक्ष आपल्याला थारा देत नाही, असे सांगून मोहितेंविरोधकांचा गट स्थापन करून कोणत्याही परिस्थितीत मोहितेंचा पराभव करायचा चंग बांधला व त्यात विरोधक पूर्णपणे यशस्वी झाल्याने 2014 मध्ये खेडमध्ये परिवर्तन झाले. यंदा आगामी निवडणुकीसाठी अद्यापही खेड तालुका तसा शांत असल्याने “येणाऱ्या वादळाची ही चाहूल तर नाही ‘ना अशी शंका सध्या राजकीय विश्लेषकांच्या मनात चुकचुकत आहे.
मोहिते पाटील यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात तसा खेडचा विकास चांगला झाला होता. त्यांच्या काळात आदिवासी बहुल असलेल्या पश्चिम भागात नद्यांवर व धरणांतर्गत पुलांची कामे अधिक प्रमाणात झाली होती. त्या मानाने गोरे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राजगुरुनगरचा पूल सोडला तर मोठी अशी कामे दिसत नाहीत.
सध्या केंद्रात युतीचे सरकार आहे, त्यामुळे तालुक्यात विकासनिधी मिळवायचा असेल तर आपल्याही मतदारसंघात युतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे अशी चर्चा सध्या सुज्ज्ञ मतदारांमध्ये असली तरी अद्याप “युती’ आणि “आघाडी’चे “घोडे गंगेत न्हाले’ नसल्याने इच्छुकांचीही “गोची’ झालेली आहे.
राष्ट्रवादीकडून कोणाला लागणार “लॉटरी’
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असून यात नवीन चेहऱ्यापासून अगदी ज्येष्ठापर्यंत इच्छुक आहेत. त्यातच हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी दीर्घ अनुभवल असेलेल्या संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे चाकण “दंगली’चा ससेमिरा लागला असल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाल्याने राष्ट्रवादीकडून कोणाला “लॉटरी’ लागेल हे निवडणूक जाहीर झाल्यावर कळेल.
युती होणार की भाजप-सेना स्वतंत्र लढणार?
शिवसेना-भाजपचे प्रमुख नेते युती होणारच असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप सर्वच विधानसभा मतदारसंघात मुलाखती घेत आहेत. तशाच मुलाखती आळंदी-खेडमध्ये झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे तिकीट आमदार सुरेश गोरे यांनाच मिळणार असल्याने शिवसेनेमध्ये तिकिटासाठी चढाओढ नसली तरी युतीचे घोडे अद्याप गंगेत न्हाले नसल्याने येथे भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार का? युती झाली तर भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराचे मनापासून काम करणार का? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.