भोर – करोनाच्या संकटामुळे या वर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या दिंड्या करोनाच्या संकटामुळे पंढरपुराकडे मार्गस्थ झाल्याच नसल्याने शेकडो वर्षांच्या पायी वारीची प्रथा पहिल्यांदाच खंडित झाल्याने भोर तालुक्यातील गावोगावच्या विठ्ठलभक्तांनी भजन-कीर्तन आयोजन करून घरच्या घरीच आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला.
भोर-भोलावडे येथील राज तेज हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात या निमित्ताने भोर तालुक्यातील काही निवडक पालखी दिंड्यांमार्फत “यंदाची वारी घरच्या घरी’ या उपक्रमाचे आयोजन करुन प्रवचन, भजनातून आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले. कीर्तनकार हभप उमेश महाराज शिंदे, हभप प्रणीती रिठे, हभप दर्शना लेकावळे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली हा प्रवचन- भजनाचा कार्यक्रम झाला.
खानापूर दिंडीचे कार्यवाहक हभप पंढरीनाथ भिलारे, हभप शिंदे महाराज, राजतेज सोसायटीचे दत्तात्रय गावडे, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, विठ्ठल रखुमाई वाळवंट मंदिराचे कालिदास आवाळे, नाना किंद्रे, बाळासाहेब मळेकर, उत्तम चंदनशिव, संग्राम राजेशिर्के, भानुदास साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
हरिनामाचे भजनात राज्य पुरस्कार प्राप्त मृदंगमणी ऋषीकेश शिंदे, तबला वादक दिग्विजय देशमुख, यांनी साथ दिली. या वेळी करोनावर मात करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी, करोनाचे संकट पळवून लावावे असे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले.