शेवगाव – दक्षिण गंगा गोदावरी काठी असलेले तसेच भगवान निंबकाचार्यांचे जन्मस्थळ म्हणून तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगीचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. अलीकडे मात्र या प्राचिन तीर्थक्षेत्राचा लौकिक वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होतो आहे. येथील महिलाच्या अंत्यविधी नंतर त्यांची रक्षाच चोरीला जात असल्याचा अनुभव ग्रामस्थाना येऊ लागला आहे. मृतांच्या अंगावरचे किडुक मिडूक सोने नाणे मिळवण्यासाठी काही जण समशानभूमीतील राखच गायब करत आहेत.
काळ्या कसदार शेतीचा परिसर आणि गर्भश्रीमंती लाभलेल्या कुटुंबांचे वास्तव्य असलेलं हे गाव. हिंदू समाजाच्या अंत्यविधिच्या प्रथेनुसार हिंदू पुरुषांच्या अंगावरील करगोटा देखील तोडला जातो. तर महिलांच्या निधनानंतर तीच्या तोंडात सुवर्ण पान ठेवतात. त्यात महिला अहेव असेल म्हणजे तिचा पति हयात असतांना तीचे निधन झाले असेल तर अशा सुवासिनीच्या अंगावरील तीचे सुवासिनीचे म्हणून समजले जाणारे नाकतील नथ, गळ्यातील मणी मंगळसुत्र, कानातील कुडकं, आणि पायाच्या बोटातील जोडवी न काढण्याची प्रथा आहे.
कालपरत्वे परिस्थितीनुरुप यात बदल होतो आहे. तरीही किमान एक दोन कमी वजनाचे अलंकार तसेच ठेवून अग्नी संस्कार करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी राख सावडण्याच्या वेळी काही अस्थी दहाव्यासाठी ठेवून सर्व रक्षा, अस्थि अगदी झाडून तीर्थ क्षेत्र स्थळी गंगेत विसर्जीत केल्या जातात.
रक्षा विसर्जित करण्याच्या ठिकाणी विसर्जित राखेतून किडूक मिडूक व पैसे शोधणाऱ्या अनेक टोळ्या असतात. अनेकदा या टोळ्या राखेचे विसर्जन करेपर्यंत सुद्धा थांबत नाहीत. रक्षा विसर्जनासाठी आलेल्या दुःखितांच्या हातातून रक्षेचे गाठोडे हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
सध्या मुंगीला देखील याच लोभापोटी या रक्षेच्या चोरीचा नवीन फंडा या टोळ्यातील लोकांनी सुरु केला असावा. मुंगीचे सामाजिक कार्यकर्ते भगवान खुरमुरे यांची चुलती कै. सुलोचना नारायण खुरमुरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर रात्रीच त्यांची रक्षा गायब झाली आहे. दशक्रिया विधीसाठी लागणारी अस्थी सुद्धा शिल्लक ठेवत नसल्याने मुंगी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याअगोदर देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता या भागात अंत्यविधी झाल्यानंतर तेथे पहारेकरी ठेवण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे.