नवी दिल्ली – देशभर उष्णतेचा महाप्रचंड प्रकोप सुरु असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. देशात आज जैसलमेरचा पारा 45. 3 अंश सेल्सियसवर पोहोचला, तर राजधानी दिल्लीमध्ये हा पारा 42 अंशाच्या पुढे गेल्याचे दिसून आले. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशचा मैदानी भाग, गुजरात, कच्छ, महाराष्ट्र संपूर्ण आणि आंध्र, तेलंगणसह पश्चिम बंगाल, तामिळनाडु अशा सर्वच राज्यात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
अशातच मोका चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालसह पूर्व किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा देणारा पिवळा बावटा लावण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, उष्णतेचा हा प्रकोप 15 मे पर्यंत तरी तीव्र स्वरुपाचा राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदलानंतर शनिवारी अनेक ठिकाणी पारा 42 अंशांच्या पुढे गेला. या मोसमातील हा सर्वात उष्ण दिवस आहे. शुक्रवारी दिल्लीचे कमाल तापमान सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. त्याचवेळी 2018 नंतर 12 मे रोजी दुसऱ्यांदा पारा 42 अंशांच्या पुढे गेला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, नवी दिल्लीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्र्कानुसार, शुक्रवारी दिल्लीचे कमाल तापमान 42.5 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. त्याच वेळी, किमान तापमान 19.3 अंश होते, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी कमी आहे. तर दिल्लीतील नजफगढ भाग सर्वाधिक उष्ण होता. येथे कमाल तापमान 44.1 अंश, तर किमान तापमान 24.9 अंश इतके नोंदवले गेले.
शनिवारी आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज केंद्राने वर्तवला होता. संध्याकाळी किंवा रात्री धुळीचे वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी उष्ण वारेही अपेक्षित आहेत. कमाल तापमान 43 आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे, राजस्थानमध्ये कडक उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. जैसलमेरने सर्वाधिक तापमानाची नोंद केली असली तरी, जयपूर, टोंक, उदयपूर, अजमेर येथेही तापमान 43 ते 44 अंश सेल्सियसच्या दरम्यान आढळून आले. त्याचप्रमाणे तेलंगण, आंध्र प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश येथे सर्वत्र घामाच्या धारा लागल्या होत्या. गुजरात, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. मुंबईसह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जरा बरी स्थिती होती. तरीही इथे पारा 42 अंशाच्या जवळपास होता.