विसगाव खोरे -भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात आखाड पार्टी कुटुंबासोबत साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तर शेताच्या बांधावरच या पार्टीचे आयोजन केले जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल-ढाबे या ठिकाणांवर फक्त पार्सललाच परवानगी असल्याने ही ठिकाणे पार्टीसाठी टाळली जात आहेत.
सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने गणेशोत्सव, नवरात्र आणि दसऱ्यापर्यंत बहुतांश नागरिक मांसाहार करीत नाहीत. यामुळे आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी अशा पार्ट्यांच्या आयोजन करून मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जात आहेत.
आखाडाचा शेवटचा दिवस रविवारी आल्याने ग्रामीण भागात शेतकरी बांधावरील म्हसोबा, वनस्पती मरीआई, काळुबाई या देव-देवतांना विधिवत इरजिक करण्याचे बेत करत आहेत.
आखाड साजरा करण्यासाठी हॉटेल, ढाबे यांना पसंती दिली जाते. ग्रामीण भागात एकत्रित येऊन बाहेर आखाड साजरा करण्याची परंपराच आहे; परंतु गेली दोन वर्षे करोना विषाणूचा वाढता संसर्ग व जमावबंदी यामुळे या
ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर मर्यादा आल्याने आखाड पार्टी घरच्या घरी व कुटुंबीयांसमवेत साजरी करण्यात येत आहे. या दरम्यान भावकी एकत्र येत शेताच्या बांधावर बकरे, कोंबडे कापले जाते, त्याचे भाग (वाटे) लावले जातात. देवाच्या नैवेद्याकरीता एक भाग काढला जातो, बाकीचे भाग वाटून घरी नेले नेऊन बेत साधला जातो.