पुणे, दि. 22 -मेट्रो मार्ग क्रमांक 3 शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचे काम अद्याप सुरूही झालेले नसतानाच, जानेवारी 2024 पर्यंत पूल पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे काम नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ लोकसभा 2024 च्या निवडणुकीपूर्वी तो पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
लोकसभेच्या मागील निवडणुका मे 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे 2024 मध्येही त्या याच महिन्याच्या आसपास होतील. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणारे काम दहा महिने आधीच पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंपनीस देण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) बैठक गुरुवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल पुढील सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचनाही “पीएमआरडीए’ला या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
लगबग कशासाठी?
लॉकडाउनच्या काळात जवळपास दोन वर्षांपूर्वी हा पूल पाडण्यात आला आहे. त्यानंतर अद्यापही या चौकातील वाहतुकीचे नियोजनच प्रशासनाकडून सुरू असून, पूलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. चौकातील सेवा वाहिन्यांचे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक वळविण्याचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याने या पुलाचे काम सुरू झालेले नाही. आज झालेल्या बैठकीत “पीएमआरडीए’कडून उड्डाणपुलाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात नोव्हेंबर 2024 मध्ये पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. हे काम ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशखिंड रस्त्यावर 11 मीटर बॅरिकेड टाकून केले जाणार आहे. तर मे 2024 नंतर केवळ 3 मीटरचे बॅरिकेडींग करून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण केले जाणार होते. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देत हे काम जानेवारी 2022 पर्यंतच पूर्ण करण्याचे आदेश “पीएमआरडीए’ला देण्यात आले आहेत. या कालावधीत देशात लोकसभा निवडणुका होतात. त्यामुळे, ऐन निवडणुकांच्या धामधुमीत हा पूल उद्भाटनासाठी सज्ज ठेवण्यासाठी दहा महिने आधीच हे काम पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे.
दीड वर्ष काय केले?
एका बाजूला प्रशासनास पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत जानेवारी 2024 मध्ये पुलाचे काम पूर्ण करण्यास सांगणाऱ्या “पुम्टा’मधील अधिकाऱ्यांना गेल्या दीड वर्षांपासून या चौकात पुणेकर सहन करत असलेला वाहतूक कोंडीचा त्रास दिसला नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जवळपास दीड ते दोन वर्षांपूर्वी हा पूल पाडण्यात आला आहे. त्यानंतर वारंवार पुलाचे आराखडे बदलत कामास विलंब झाला आहे. त्यात आता सेवा वाहिन्या, रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सोडविण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष असताना राज्यात सत्ताबदल होताच प्रशासनाला पुणेकरांची वाहतूक कोंडी दिसू लागली आहे. त्यामुळे दीड वर्षात काय केले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.