पुणे, दि. 22 -केवळ पदाच्या लोभापायी जो पक्ष मागील अडीच वर्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दावणीला बांधला, तेव्हा का मिंधे झालात, शिवसैनिकांचे नुकसान का केले, असा सवाल राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. आगामी विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची ताकद नक्की दाखवू, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्ह्यासंदर्भात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी देसाई पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी देसाई यांना ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी ठाकरेच दोन्ही कॉंग्रेसचे अडीच वर्ष मिंधे झाले असल्याचा पलटवार केला. राज्यातील मतदारांनी नैसर्गिक युती सरकारलाच पाठिंबा दिला होता. हीच युती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही खरी शिवसेना घेऊन भाजपसोबत गेलो. नागरिकांचा या सरकारला उत्स्फूर्द प्रतिसाद आहे. त्याचा प्रत्यय मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंदू गर्व गर्जना यात्रेतून दिसून येत आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निकालात जनतेचा कौल नैसर्गिक युती असणाऱ्या सरकाच्या बाजूने दिसून आला आहे, तर ठाकरे पाचव्या स्थानी गेले आहेत, याचे आकलन त्यांनी करण्याची गरज असल्याचे देसाई यांनी सांगितले.
पवारांच्या टीकेला उत्तर
राज्यातील विकासकामे रखडलेली असताना मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावर देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री मौजमजा करण्यासाठी फिरत नसून, राज्याच्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीपर्यंत जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे अडीच वर्ष घरात बसून होते. तेव्हा पवार यांनी त्यांना बाहेर पडा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या, मंत्रालयात जा असा सल्ला दिला असता, तर आज ही वेळ आली नसती.