देशात 15 मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन आणि बकरी ईदच्या दिवशी देशात मोठा घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणाने दिला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने यासंबंधी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना यासंबंधीचे आदेश दिले असल्याचीही माहिती समोर येत आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार मुंबई-दिल्लीसह देशातील 15 मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात दोन मोठे सण असून त्यादरम्यान दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतातील शहरामध्ये दहशतवादी मोठा हल्ला करू शकतात, असा इशारा आयबीने दिला आहे. आयबीने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कलम 270 रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमध्येही रोष व्यक्त केला होता. त्याधर्तीवर तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल काश्मीर दौऱ्यावर आहेत.