नांदूर – काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दौंडच्या पश्चिम पट्ट्यात दोन दिवसांपासून जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजाच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नागरिकांना बाजरीचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.
ऑगस्ट महिन्यात तालुक्यात अनेकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तीन ते चार दिवस मुळा-मुठा नदी लगतची गावे पाण्याखाली गेली होती. पूर येऊन गेला; परंतु पाऊस नसल्यामुळे खूप मोठी पाणी टंचाई भासू लागली होती. मात्र, दोन दिवस चालू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसत आहे.
शेतकरी बाजरीचे पीक काढत असताना विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक बरसायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची खूपच मोठी धावपळ दिसून आली आहे. हाती आलेले बाजरीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे पाण्याची गरज, तर दुसरीकडे बाजरी काढण्याची धावपळ अशी स्थिती येथील शेतकऱ्यांची पाहायला मिळाली आहे.