सागर – मध्यप्रदेशातही उत्तरप्रदेशकडे निघालेल्या 5 स्थलांतरित मजुरांवर शनिवारी काळाने घाला घातला. महाराष्ट्रातून काही मजूर एका कपड्यांच्या ट्रकमधून उत्तरप्रदेशला निघाले होते. तो ट्रक मध्यप्रदेशात सागर-कानपूर मार्गावर उलटला. त्या अपघातात 5 मजूर जागीच मृत्युमुखी पडले. तर 19 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले.
लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेले स्थलातंरित मजूर आपापल्या राज्यांत जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यातून ते असुरक्षित प्रवासाचा धोकाही पत्करताना दिसत आहेत. तशाप्रकारच्या प्रवासावेळी अपघात घडण्याच्या विविध घटना मागील काही दिवसांत देशाच्या विविध भागांत घडल्या आहेत. त्यातील जीवितहानीमुळे स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.