नवी दिल्ली -करोनाबाधितांच्या संख्येत गुजरात आणि तामीळनाडू ही दसहजारी राज्ये बनली आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येचा विचार करता ती राज्ये देशात अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
देशात सर्वांधिक 30 हजारांहून अधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ क्रमांक लागलेल्या गुजरातमध्ये शनिवारी तब्बल 1 हजार 57 नवे रूग्ण आढळले. त्यामुळे त्या राज्यातील बाधितांची संख्या 10 हजार 989 इतकी झाली आहे. गुजरातध्ये करोनाने आतापर्यंत 625 जणांचा बळी घेतला आहे. त्या राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात सर्वांधिक 8 हजार 144 करोनाबाधित आढळले आहेत. त्या जिल्ह्यातील मृतांची संख्या 500 च्या घरात पोहचली आहे.
करोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आणि गुजरातपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर तामीळनाडू आहे. तामीळनाडूतील करोनाबाधितांची संख्या 10 हजार 585 इतकी झाली आहे. मात्र, त्या राज्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या तुलनेत कमी जीवितहानी झाली आहे. त्या राज्यात करोना संसर्गामुळे आतापर्यंत 74 रूग्ण दगावले आहेत. दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येनेही याआधीच 9 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.