हिंगोली, (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे )- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चार मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदान यादीतून वगळल्यानंतर शेतकऱ्यांनी संप सुरू केला असून शेतकऱ्यांनी दि 18/09/2022रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळला. या प्रकरणी 21 शेतकऱ्यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अतिवृष्टीच्या मदतीतून या चार मंडळांना वगळण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप पुकारून गोरेगाव येथे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात रविवारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
घटनास्थळी गोरेगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट
या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्याचे जमादार गजेंद्र सुभाषराव बेडगे यांनी तक्रार दाखल केली यामध्ये जमाव बंदीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे. यावरून पोलिसांनी गजानन कावरखे,नामदेव पतंगे,शामराव रणबावळे,गजानन साळुंखे,अनिल कावरखे,पंजाब कावरखे,यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील,जमादार बेडगे मैदनकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
विविध मागण्यांसाठी संप सुरू पण एकही अधिकारी फिरकला नाही
अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संप सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही. आता ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे तर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.