मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण संजय राऊत यांना न्यायालयाने कोणताच दिलासा दिला नाही. संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती, पण आजच्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.
सुरुवातीपासूनच संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीचा भूमिका होती. मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती.
संजय राऊत यांचा मुक्काम 4 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच असणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राऊत यांना जामीन देऊ नये, अशी ईडीची भूमिका आहे.