ऍडलेड: ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात भारतात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. नेहमीप्रमाणे मिडिया स्ट्रॅटीजी सुरु झाली असून माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने भारतीय गोलंदाजांवर शेरेबाजी करताना त्यांना कमी लेखले आहे. भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान राखले.
भारताने मायदेशात सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला. या यशात सिंहाचा वाटा गोलंदाजांचा होता, मात्र हेच यशस्वी गोलंदाज ऑस्ट्रेलियात कच खातात, अशी शेरेबाजी माजी कर्णधार रिकी पॉनिंटगने केली आहे. ऑस्ट्रेलियाचे मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स तसेच नवोदीत गोलंदाजच मला भारतीय गोलंदाजांपेक्षा जास्त सरस वाटतात असे सांगत पॉंटिंगने प्रसिद्ध मीडिया वॉर सुरु केले आहे.
भारतीय संघाला दर्जेदार वेगवान तसेच फिरकी गोलंदाज मिळाले आहेत, पण ते ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर फारसे यशस्वी होणार नाहीत. वेगवान गोलंदाजांना थोडीतरी मदत खेळपट्टीकडून मिळेल पण फिरकी गोलंदाज सपशेल कच खातील असेही त्याने सुचित केले आहे.
भारतीय गोलंदाजांकडे गुणवत्ता आहे यात शंका नाही. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांनी सातत्यपुर्ण कामगिरी केली आहे, हे देखील मान्य करतो पण हेच गोलंदाज ऑस्ट्रेलियात याच यशस्वी कामगिरीत सातत्य राखण्यात कमी पडतील. इतिहासात डोकावले तर भारतीय गोलंदाज यथील खेळपट्टीवर कच खातात हेच सिद्ध होईल, असेही त्याने व्यक्त केले.