जोरहाट, दि. 21 – आसामात प्रचारासाठी दाखल झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना मोदींच्या आणि राज्यातील भाजपच्या कारभावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की मोदींच्या आसामातील सभेत ते या राज्यातील जनतेच्या समस्येवर बोलतील असे वाटले होते पण त्यांनी त्यावर कोणतेही भाष्य न करता दिशा रवी नावाच्या 22 वर्षीय मुलीने केलेल्या ट्विटचा विषय उपस्थित केला ही दुर्देवी बाब आहे.
त्या म्हणाल्या की काल मी मोदींचे आसामातील प्रचार सभेतील भाषण ऐकत होते. यावेळी ते भाजपने आसामात काय विकास केला या विषयी माहिती देतील असे वाटले होते पण त्यांनी 22 वर्षीय मुलीने केलेल्या ट्विटचा विषय उपस्थित केला. कॉंग्रेसने आसामातील चहाचा उद्योग नष्ट केला याचे आपल्याला दु:ख झाले असे मोदी त्या सभेत म्हणाले.
कॉंग्रेसने सोशल मिडीयात दोन चुकीचे फोटो कसे टाकले याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केले. पण आसामातील पुरात लाखो लोकांचे जीवन उद्धवस्त झाले त्याबद्दल त्यांना दु:ख झाल्याचे मी त्यांच्या तोंडून ऐकले नाही. सीएए कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात पाच युवकांचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाला त्याबद्दल त्यांना दु:ख झाल्याचे मी ऐकले नाही.
येथील पुरात जेव्हा लोक उद्धवस्त झाले त्यावेळी तुम्ही येथे का आला नाहींत असा सवाल करून त्या म्हणाल्या की, आसामात भाजपने जे मोठमोठे दावे केले होते व आश्वासने दिली होती, ती पुर्ण न केल्याची त्यांना जराही खंत का वाटली नाही असा सवालही त्यांनी केला. आसामातील सरकार हे डबल इंजिन सरकार आहे असा दावा मोदींनी केला होता.
राज्य सरकारच्या मदतीला केंद्राचीही मदत होत आहे असे त्यांना म्हणायचे होते. त्या डबल इंजिन सरकार शब्दावरून मोदींची खिल्ली उडवताना त्या म्हणाल्या की येथे खरोखरच डबल इंजिन सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि हिमंता विश्वशर्मा ही दोन स्वतंत्र सत्ता केंद्रे आहेत या संबंधात प्रियांकांनी डबल इंजिन सरकार असा शब्दप्रयोग वापरून भाजपवर निशाणा साधला.
त्या म्हणाल्या की यातले कोणते इंजिन कोणत्या इंधनावर चालते याची मला कल्पना नाही पण आसामातील सरकार आसामातील जनतेसाठी काम करीत नाही हे मात्र येथे दिसते आहे. आसामातील विविध घटकांना भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक केली आहे असा आरोपही त्यांनी केला.