प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी व विनोबांसारख्या लोकांनी सामाजिक समतेचा पंचसूत्री आदर्श घातलेला आहे. त्यांचे विचार लोकस्वराजातूनच समाजात पोहोचतील. भांडवलशाहीमुळे सामाजिक विषमता वाढत असून सामूहिक भांडवलशाही अर्थात लोकस्वराजच यावर उपाय ठरू शकतो, असे ठाम मत गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत धान पुणे विकास परिसंवादाचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र बॅंकेचे दिनकर बुद्धे, धान अकादमीचे संचालक ए. गुरुनाथन व टाटा विमा कंपनीचे अधिकारी आर. श्रीनिवासन उपस्थित होते. ए. गुरुनाथन यांनी हा परिसंवाद विकासाच्या ज्ञानाचा महोत्सव असून यातून सामाजिक विकासाच्या महत्वाच्या अंगावर चर्चा होईल, असे सांगितले. तसेच केवळ ज्ञानासाठी ज्ञान म्हणून हे परिसंवाद न होता यात तळागाळात जाऊन काम करणारे कार्यकर्ते, लोक समुदाय आणि इतर संस्था सहभागी होतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, धान फाउंडेशन ही वित्तपुरवठ्याच्या पुढे जाऊन शिक्षण आरोग्य व सामाजिक सुरक्षेसारख्या विषयांवर काम करणारी संस्था असल्याचे सांगितले. तसेच धान फाउंडेशन व टाटा यांच्या संयुक्त कार्यक्रमात साधारणतः 1 लाख लोकांचा विमा उतरवला असल्याचेही आर. श्रीनिवास यांनी सांगितले. प्रास्ताविक गजानन पाटील यांनी केले. नितीन खडके यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शिवानंदन यांनी आभार मानले.