प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – पीएमपीने शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील 12 मीटर लांबीच्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना पाच दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वगळता एकाही राजकीय पक्ष अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी भूमिका जाहीर केलेली नाही. शिवाय, जनतेचा प्रश्न असूनही आंदोलन केलेले नाही. त्यामुळे या शांततेमागे नेमके काय राजकारण आहे? असा संतप्त प्रश्न पीएमपीचे नियमित प्रवासी आणि विद्यार्थी भाऊ आणि दादांना विचारत आहेत.
मध्य वस्तीत नेहमीच वाहतूक कोंडी होते. यासाठी पीएमपी प्रशासनाने 12 मीटर लांबीच्या बसचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दहा मार्गांवरील बसेस आता टिळक रस्ता आणि लालबहाद्दूर शास्त्री रस्ता या मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्यवस्तीत येणारे विद्यार्थी, कामानिमित्त येणारे चाकरमाने आणि खरेदीसाठी येणारे नागरिक-व्यापारी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर सुमारे 14 शाळा आहेत. त्यामुळे बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. या मार्गांवरून छोट्या बसेस धावत आहेत. प्रवासी संख्या पाहता, ती सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दोन बस बदलून प्रवास करावा लागत आहे. “पुण्यदशम’च्या 24 बस धावत असल्याने या मार्गांवर प्रत्येक दोन मिनिटांनी बस येणार असल्याचा दावा पीएमपीने केला आहे.
पण, मागील चार दिवसांत हा दावा फोल ठरला आहे. तसेच या बसची आसन क्षमता 24 आसन, तर उभे राहून प्रवास मर्यादा 8 आहे. पण या बसमध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. या मार्गांवरील मोठ्या बसेस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
राजकीय पक्षांना जनतेचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. राज्यात आणि शहरात सत्ता मिळविण्यात जास्त रस आहे. रोज नवनवीन वाद निर्माण करायचे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांसमोर यायचे.
– रामचंद्र कडू,
ज्येष्ठ नागरिक
बसमार्ग वळवल्याने त्रास सहन करावा लागत आहे. यावर एकाही राजकीय पक्षाने आंदोलन केले नाही. इतर प्रश्नांवर आंदोलन करणारे जनतेच्या प्रश्नावर मात्र गप्प का?
– महेश पाटील, प्रवासी
पीएमपीचा एकतर्फी निर्णय या राजकीय पक्षांना मंजूर आहे का? हे एकदा नेत्यांनी जाहीर करावे. लवकरच निवडणुका आहेत. मग आम्ही ठरवू कोणाला मतदान करायचे.
– संकेत कांबळे, प्रवासी