पाटणा – आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे विधान काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते. त्यावरून भाजपकडून विशेषत: भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून नितीश यांना जोरदार लक्ष्य केले जात असताना नितीश यांनी घुमजाव केले आहे. भाजपला किती जागा मिळतील हे आपण बोललोच नव्हता, असा दावा त्यांनी आज केला आहे.
संयुक्त जनता दलाच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत नितीश यांनी काल हे विधान केले होते. त्यानंतर आज दिवसभरात त्यांच्या पक्षाचे नेते आणि भाजपचे बिहारचे नेते यांच्या शाब्दीत आतषबाजी सुरू होती. त्यावरूनच आज पत्रकारांनी नितीश यांना छेडले असता आपण भाजपला किती जागा मिळतील याबाबत काहीही बोललो नसल्याचा दावा त्यांनी केला.
आपला विरोधकांच्या एकीवर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. सगळे विरोधी पक्ष जर लोकसभा निवडणुकीत एकत्र आले तर आम्हाला यश मिळेल. मी असे आकड्यांबाबत बोलत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नितीश यांनी काल त्यांनी जे म्हटले त्याचा इन्कार केला असला तरी त्यांच्या पक्षाकडून जे निवेदन काल जारी करण्यात आले होते त्यात नितीश हेच बोलल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नितीश यांनी सरळ सरळ घुमजाव केले आहे.
त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमागे भाजपला फार अंगावर न घेण्याचे बचावात्मक धोरणही असू शकते असे राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र काहीही असले तरी देशभरात अन्य पक्षांची सरकारे पाडून आपले सरकार आणणाऱ्या भाजपला नितीश यांनी बिहारमध्ये जो दणका दिला आहे तो भाजपची नाचक्की करणारा ठरला आहे.
त्यामुळे भाजप नितीश यांना सहज सोडणार नाही. त्यांना कुठेतरी टप्प्यात आल्यावर लक्ष्य केले जाईल असेही निरीक्षकांचे म्हणणे आहे.
संयुक्त जनता दलाकडून आतापर्यंत केवळ राजीव ललन सिंह आणि नितीशच पक्षाची भूमिका मांडत आहेत. अन्य नेत्यांनी अद्याप तोंड उघडलेले नाही ते आतापर्यत पक्षाला फायद्याचे होते. त्या अन्य नेत्यांनी तोंड उघडावे आणि काहीतरी चूक करावी याकरता भाजपकडून रोज जनता दलावर तोंडसुख घेतले जाते आहे.
एकेकाळी नितीश यांचे डेप्युटी राहीलेले भाजप नेते सुशील मोदी रोजच नितीश आणि त्यांच्या नव्या सरकारला लक्ष्य करत आहेत.
त्यामुळे 2024 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहुन जाण्याची शक्यता आहे. राजकीय रणनितीकार आणि आता बिहारच्या राजकारणात सक्रिय झालेले प्रशांत किशोर यांनीही बिहारच्या राजकारणात लवकरच आणखी एक भूकंप होणार असल्याचा दावा अगोदरच केला आहे.