मेढा – जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनल्याने मेढा शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असून मेढा नगरपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
मेढा शहरात अशुद्ध स्वरूपात पाणीपुरवठा होत असून नगरपंचायतीकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर नदीतील पाणी केवळ ऍलम मिसळवून टाकीत भरले जात आहे व तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहचत आहे. करोनाच्या दहशतीखाली आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नगरपंचायत करत असताना नगरपंचायतीनेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत.
असे असले तरी नागरिकांकडून पाणी कराची वसुली मात्र जबरदस्तीने केली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाने पाणी कर दुप्पट केला. शहरातील बऱ्यापैकी नागरिकांकडे स्वत:ची पाणी व्यवस्था आहे. त्यामुळेच नगरपंचायतीचे फावत आहे.
मात्र, काही भागात नागरिकांच्या बोअरला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच विसंबून राहवे लागत आहे. नगरपंचायतीने पाण्याचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला पाण्यामधून जिवंत आळ्या व इतर कीटक येत असल्याचे नागरिक सांगत आहेत.