नगर – खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवार) महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी खाली काय गोंधळ घालतात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी कारभारात सुधारणा करावी; अन्यथा कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत फडणवीस यांनी शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश ओला यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदारांनी महावितरणच्या कारभाराबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. बिल भरले नाही तर जळालेले रोहित्र बदलले जाणार नाहीत, ऑइल बदलले जाणार नाही, असे अधिकारी व कर्मचारी सांगतात. जळालेले रोहित्र बदलण्यास महिन्याचा कालावधी लागतो, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळत नाही, आदी तक्रारी राम शिंदे, शिवाजी कर्डिले, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे आदींनी केल्या.
यावर फडणवीस म्हणाले की, बिल भरले नाही तर रोहित्र बदलले जाणार नाही, असा आदेश दिलेला नाही. त्या ठिकाणी पाच ते सात वर्षांपेक्षा अधिक थकीत रक्कम आहे तेथे ही सूचना लागू राहील. जेथे कमी कालावधीची थकबाकी आहे, तेथे ही सूचना लागू राहणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कृषी वीजपुरवठ्यासाठी 890 फीडर आहेत, त्यातील 343 फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी जमिनी उपलब्ध झाल्या आहेत, सर्व कृषी फिडरचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी जागा उपलब्ध करावी. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालावे, अशीही सूचना फडणवीस यांनी केली.
अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण रक्कम भरपाई मिळालेली नाही, याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले. त्यावर फडणवीस यांनी सततच्या पावसाने झालेले नुकसान वगळता इतर सर्व निधी सरकारने वितरित केला. आता थेट मुंबईतून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीची भरपाई येत्या पंधरा दिवसांत उपलब्ध केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.