महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या दोन्ही राजकीय आघाड्यात सुंदोपसुंदी सुरू असून त्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्ये पाहता या दोन्ही आघाड्या अस्तित्वात राहतील का, अशी शंका येते.
अकरा महिन्यांपूर्वी सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांतील भांडणे आता चव्हाट्यावर येत आहेत. बरे ही भांडणे केवळ तीन पक्षांच्या महविकास आघाडीत आहेत, असे नव्हे, तर अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अनेक “बेकायदेशीर’ घटनांच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर येऊ शकलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या पक्षातही आहे किंवा त्यांच्याशी जवळीक ठेवून असलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचेही त्यांच्याशी सख्य आहे, असे नाही. सहा पक्षांच्या सहा तऱ्हा! तेही लोकसभा निवडणुका केवळ एक वर्ष दूर असताना! 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लागोपाठ तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले, तर लागोपाठ तीन वेळा सत्तेवर येण्याचा केवळ पंडित जवाहलाल नेहरू यांच्या नावावर असलेल्या विक्रमाची ते बरोबरी करतील. त्यामुळेच भाजपला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. कर्नाटकच्या निकालाने भाजपचे दक्षिण द्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्नाटकाकडून भाजप फारशा अपेक्षा ठेवू शकत नाही.
उत्तरप्रदेशनंतर जास्त लोकसभा सदस्य असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र! अर्थात महाराष्ट्रात भाजपला मोठा वाटा मिळावा यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार आणलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. पण असं असूनही भाजप आणि कॉंग्रेसचं त्यांना साथ देणाऱ्या पक्षांशीच वैर का आहे आणि याचं खरं उत्तर आहे भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना राज्यात फक्त त्यांचेच प्राबल्य हवं आहे. या दोन्ही पक्षांच्या या द्विपक्षीय वाटचालीत खरा अडसर ठरत आहेत शरद पवार! भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना राज्याच्या राजकारणात क्षेत्रीय पक्ष नको आहेत. एक प्रकारे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात या राज्यातील दोन पक्षांच्या राजकारणाची परिस्थिती महाराष्ट्रात असावी, असं त्यांना वाटतं.
भाजपविरुद्ध तीन पक्षांची आघाडी होऊ शकली केवळ 1978 पासून महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वत:ची पकड ठेवून असणाऱ्या शरद पवारांमुळेच! अनेक आजारांवर मात करून आज वयाच्या 82 व्या वर्षी पवार उभे आहेत! पण प्रकृतीच्या मर्यादा उघड होत असल्यामुळेच कॉंग्रेसने हळूहळू आपली वेगळी ताकद दाखवणं सुरू केलं आहे. आताही नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावर त्याच कारणासाठी नियुक्ती केली आहे असं वाटतं. नानांनी पदावर आल्यापासून राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलं आहे. नाना ही भूमिका पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद असल्याशिवाय घेऊ शकत नाहीत.
पवार आणि ठाकरे या नातेवाईक असलेल्या दोन्ही क्षेत्रीय नेत्यांना हरवणं सोपं नाही याची कल्पना या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना आहे. पवार आणि ठाकरे एकत्रित येऊन कॉंग्रेसला कोंडीत पकडत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 19 खासदार जिंकून आलेल्या शिवसेनेने मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे असलेल्या सर्व जागा लढण्याचा दावा केला आहे. भलेही त्यातले बारा त्यांना सोडून शिंदे गटात सामील झालेले असतील. अर्थात कॉंग्रेस हे सहजासहजी स्वीकारणार नाही. विदर्भासह राज्यात सर्वदूर असलेला पक्ष केवळ कॉंग्रेसच आहे. त्यामुळे कॉंग्रेस केवळ आठ जागा स्वीकारणं शक्य नाही किंवा तिन्ही पक्ष प्रत्येकी 16 जागा स्वीकारणं शक्य नाही. कारण सेनेने 19 जागा जिंकल्या होत्या. तीनही पक्षांना काळाची गरज ओळखून जागावाटप करताना दोन पावलं मागे येणं आवश्यक आहे. पण सध्या तर संजय राऊत राणा भीमदेव थाटात आम्ही 19 जागा लढूच, असं ठामपणे सांगत आहेत.
तर तिकडे तीन पक्षांत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार सांगतात आणि त्यांच्या या विधानाला पृथ्वीराज चव्हाणांनी पाठिंबा दर्शवत सद्य परिस्थितीत नंबर गेममध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा तर केवळ 16 आमदार उरलेला शिवसेना हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे सांगण्यास विसरले नाहीत. मविआतले तीनही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे निवडून आलेले 19 खासदार हे केवळ सेनेच्या बळावर नसून सेना भाजपची एकत्रित ताकद होती हे सांगायला कॉंग्रेसचे नेते विसरत नाहीत.
त्यातच आपली राजकीय अपरिपक्वता दाखवत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याची घोषणा केली. आंबेडकर नेहमी कॉंग्रेसची मते कमी होतील अशी भूमिका घेतात. अशा परिस्थितीत त्यांचा मविआत समावेश होणं केवळ अशक्य! म्हणजेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना जी घोडचूक उद्धव ठाकरेंनी केली तीच घोडचूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे दोन खंदे मित्र पक्ष असताना दुसरीकडेच मैत्रीचा हात पुढे केला.
तिकडे भाजप आणि शिंदे गटातही सारं काही आलबेल नाही. शिंदेंकडे गेलेले बारा खासदार निवडून येण्यासाठी भाजपवरच अवलंबून राहणार. भाजपला स्वत:चे जास्त खासदार हवे असल्याने ते शिंदे गटाच्या खासदारांना आपल्या पक्षात येण्याचं आमिष दाखवू शकतात. भाजपच्या नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या तथाकथित अपमानानंतर पक्षाने शिंदे गटाच्या दादा भुसे आणि उदय सामंत यांना तुमची मंत्रिपदे आमच्यामुळे असल्याची जाणीव करून दिली. तर तिकडे राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा असल्याचं सांगत आपण आंधळेपणाने भाजपबरोबर राहणार नाही, याची जाणीव करून दिली. एकूण काय, छीेंहळपस ळी ुशश्रश्र ळप रपू िेश्रळींळलरश्र रश्रश्रळरपलश! तूर्तास इतकेच!
जयंत माईणकर