पुणे : शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टॅंकर माफियांच्या सोयीसाठी शहरावर कृत्रिम पाणीटंचाई लादली जात आहे का? असा आरोप पुणेकरांकडून करण्यात येऊ लागला आहे. विशेष म्हणजे कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही. यामुळेच हा प्रकार केवळ टॅंकर माफियांसाठीच सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वीच बदलले आहे, त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. तेव्हापासून मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नव्याने करताना एकवेळ पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले, त्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. सदाशिव पेठ, नारायण पेठ, मंगळवार पेठ, सहकारनगर, शिवाजीनगर, एरंडवणा, कर्वे रस्ता या परिसराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसातून सकाळी केवळ एक तास पाणीपुरवठा होत असून ते ही कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना, सोसायट्यांना टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे.
…यांनी केले होते आंदोलन
अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनीही आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर टीका केली होती. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही प्रभागातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी आंदोलने केली होती. त्यानंतरही वर्षभरापासून पाणी प्रश्न मार्गी लागलेला नाही.