मुंबई : मागच्या काही दिवसांपासून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला मान्सून हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांच्या आत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे गरमीपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यातील काही अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली. मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.
अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाटरस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत.