मालाला अपेक्षित उठाव नाही : रविवारच्या तुलनेत भावात 15 ते 20 टक्के घसरण
पुणे – करोनाचा परिणाम मार्केटयार्डातील फळभाज्यांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. मालाला अपेक्षित उठावच नाही. उत्तम प्रतिचा माल खपला. मात्र, मध्यम आणि कमी दर्जाचा माल खरेदी अभावी तसाच अनेक आडत्यांच्या गाळ्यावर पडून आहे. विशेषत: कोबी, फ्लॉवर, दोडका, काकडी, भेंडी आणि सिमल मिरचीचा माल खपला नसल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
बुधवारी बाजारात 90 ते 100 गाड्यांची आवक झाली. आवकेवरही करोनाच्या भीतीचा परिणाम झाला आहे. नेहमीच्या तुलनेत 10 ते 20 कमी गाड्यांची आवक झाली आहे. रविवारीही मागील आठवड्याच्या तुलनेत बहुतांश भाज्याचे भाव स्थिर होते. मात्र, रविवारच्या तुलनेत अनेक भाज्यांच्या भावात बुधवारी सुमारे 15 ते 20 टक्के घसरण झाली.
नेहमीच्या तुलनेत कमी खरेदीदार खरेदीसाठी आले होते. सर्वसामान्यांनी भाजी खरेदीकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे त्यांनी सांगितले. गरजे इतकाच अथवा नेहमीच्या तुलनेत कमी माल त्यांनी खरेदी केला. परिणामी भावात घसरण झाली. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले होते.