प्रा. विजया पंडित
करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनच त्यावरील उपचारांसाठी निरनिराळे प्रयोग केले जात आहेत; परंतु संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची साखळी अद्याप तुटू शकलेली नाही. वैद्यकीय तज्ज्ञही त्यामुळे वेगवेगळ्या चिकित्सापद्धतींचा अवलंब करून उपचारांसाठी अनेक प्रयोग करीत आहेत. त्यामुळे उपचारांसाठी कोणता उपाय उपयुक्त आहे आणि कोणता नाही, याबद्दल हळूहळू माहिती समजू लागली आहे.
एजिथ्रोमायसिन नावाच्या प्रतिजैविक औषधाचा करोनावरील उपचारांसाठी सर्वाधिक वापर केला गेला. एवढेच नव्हे तर या औषधाचा जेवढा वापर झाला, तेवढाच दुरुपयोगही झाला. एजिथ्रोमायसिन आणि अन्य प्रतिजैविक औषधे (अँटिबायोटिक्स) विषाणूच्या संसर्गावर प्रभावी ठरत नाहीत. अँटिबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला केवळ जीवाणूजन्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या किंवा तशी लक्षणे असलेल्या रुग्णांनाच दिला जातो.
काही रुग्णांमध्ये रुग्णालयात राहून उपचार घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात. जीवाणूजन्य आजारांचा संसर्ग रुग्णांना होऊ नये, यासाठीच केवळ अँटिबायोटिक औषधे दिली जातात; परंतु ही औषधे सातत्याने दिली गेल्यामुळे रुग्णांच्या शरीरात अँटिबायोटिक औषधांसाठीची प्रतिरोधक क्षमता क्षीण झाल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयात भरती झालेल्या कोविड-19 च्या रुग्णांच्या शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता असते असे आढळून आले. अशा रुग्णांना जर रक्त पातळ करणारी औषधे इंजेक्शनच्या माध्यमातून दररोज दिली गेली तर ही समस्या निर्माण होणार नाही, यावर जगभरातील डॉक्टरांमध्ये एकमत झाले.
इन्सुलिनच्या इंजेक्शनप्रमाणे हेही इंजेक्शन त्वचेत देता येते. ठोस आधारावर हे स्पष्ट झाले असले तरी त्यावर अधिकृत चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. अन्य आजारांवरील लशी करोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम ठरू शकतात अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली होती.
उदाहरणार्थ, बीसीजी, पोलिओ, एमएमआर या आजारांवरील लस टोचून घेतल्यास करोनाचा मुकाबला करता येऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु त्यात फारसे तथ्य आढळून आले नाही. या लशींमुळे रोगप्रतिकार क्षमता खरोखर वाढते का, हे पाहण्यासाठी चाचण्या सुरू आहेत; परंतु यात तथ्य न वाटण्याचे कारण असे की, भारतात जन्मतःच सर्वांना बीसीजीची लस टोचली जाते; परंतु तरीही संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या भारतात कमी नाही.
करोनाचे संकट जेव्हा सुरू झाले तेव्हा देशात “क’ जीवनसत्त्वाचा वापर बराच वाढला. विशेषतः अधिक प्रमाणात संत्री खाऊन “क’ जीवनसत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. “ड’ जीवनसत्त्वाविषयी असेच झाले. बरेच संशोधन केल्यानंतर “ड’ जीवनसत्त्वही करोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती फारशी वाढवू शकत नाही, असे दिसून आले. फॅविपिरॅवीर नावाचे विषाणूरोधक औषध भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून सुचविण्यात आले.
पेशी आणि प्लाझ्मा यांच्या संयोगातून आपल्या शरीरातील रक्त तयार झालेले असते. जे लोक करोना संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यांच्या शरीरातील या अँटिबॉडीज जर कोविड-19 ने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्या गेल्या तर चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. सध्या तरी जगभरात करोनावर खात्रीशीर उपचार म्हणून हीच पद्धती वापरली जात आहे. या उपचाराच्या परिणामकारकतेविषयी अद्याप संशोधने सुरू आहेत.
रेमडेसिवीर नावाचे विषाणूरोधी औषध करोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याचे अनेक अध्ययनांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या औषधामुळे करोनाग्रस्त रुग्ण कमीत कमी वेळात बरा होण्याच्या शक्यता असतात. कदाचित या औषधामुळे रुग्णाला कमीत कमी दिवस रुग्णालयात राहावे लागेल; परंतु या औषधाचा वापर केल्यास करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होणारच नाही, याची खात्री मात्र देता येत नाही. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी या औषधाचा वापर केला जात आहे.
करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण आणण्यासाठी जे एकमेव उपचार कारणीभूत ठरले आहेत, ते म्हणजे स्टेरॉइडचा वापर. हे जुने आणि स्वस्त औषध आहे. सध्या उपलब्ध असलेल्या उदाहरणांच्या आधारावर असे म्हणता येऊ शकते की, डॅक्सामॅथेसॉनचा वापर करून व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण एकतृतीयांशने कमी करता येऊ शकते.
अर्थात, या औषधांचा वापर केवळ रुग्णालयांतच केला पाहिजे. संसर्गाच्या प्रारंभिक दिवसांमध्येच जर रुग्णाला हे औषध दिले गेले तर त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल. टॉसिलीजुमाब नावाचे एक औषध इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येते. रक्तात गुठळ्या होणाऱ्या रुग्णाला सामान्यतः हे औषध दिले जाते. त्याचा उपयोग गंभीर सूज कमी करण्यासाठी केला जातो. हे लक्षण करोना संक्रमित काही रुग्णांमध्ये दिसून येते. याचा वापर करून जीवाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते.
त्यामुळे या औषधाचा वापर करताना विशेषतः काही रुग्णांच्या संदर्भात अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. झिंकचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात असला, तरी त्याचा खास फायदा झाल्याची उदाहरणे नाहीत. करोनाचा संसर्ग सुरू होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. एवढ्या दिवसांनंतरसुद्धा कोविड-19 च्या संदर्भात आतापर्यंत जो अभ्यास करण्यात आला आहे, त्यांचे निष्कर्ष पूर्णतः विश्वसनीय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या सर्व विवेचनानंतर कोविड-19 संदर्भात एकच गोष्ट सांगता येणे शक्य आहे. ती म्हणजे, रोगप्रतिकारशक्ती हेच करोना विषाणूशी लढण्याचे सर्वांत प्रभावी शस्त्र आहे. रोगप्रतिकारशक्ती हेच कोविडपासून बचावासाठीचे एकमेव सुरक्षा कवच आहे.