पोलिसांकडून केवळ लुटुपुटुची कारवाई : पोलीस ठाण्यात रूपांतर झाल्यानंतरची स्थिती
आळंदी -आळंदी परिसरातील गोलेगाव ग्रामपंचायत हद्दीत हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात छापा मारून हातभट्टीचे तीन हजार लिटर रसायन, 70 लिटर दारू असा सुमारे 70 हजार रूपयांचा माल नष्ट केला. त्याआधी चार दिवसांपूर्वी आळंदी पोलिसांनी त्याच धंद्यावर लुटुपुटीची कारवाई करून अवघ्या पाच हजार रूपयांची दारू नष्ट केली
. हातभट्टी चालविणारा पप्पू राखपसरे याला फरार दाखवले. वास्तविक आळंदी पोलीस ठाण्याच्या अंकित एवढ्या मोठ्या प्रमाणावर हातभट्टीचा व्यवसाय सुरू असूनही आजपर्यंत आळंदी पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचेच नागरिकांना आश्चर्य आहे. आळंदी पोलीस चौकीचे रुपांतर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर अवैध धंदे वाढल्याचे चित्र आहे.
आळंदी तीर्थक्षेत्र आणि वारकरी सांप्रदायाचा पगडा असल्याने आळंदीत खरेतर अवैध दारूविक्री हद्दपार होणे अपेक्षित आहे; मात्र याउलट चित्र आळंदीत आहे. अनेक किर्तनकार, प्रवचनकार, राजकीय मंडळींची संख्या लक्षणीय असूनही आळंदीत अवैध दारूविक्री विरोधात चकारही काढत नाही.
आळंदीत दारू धंदे वाढल्याने रोज सकाळपासूनच प्रत्येक चौकात अगदी मंदिरापर्यंत मद्यपी रस्त्यावर आडवे पडलेले आढळतात. मद्यपींचा उपद्रव महिला वर्गाला होतो. रस्त्यावरून चालताना वाढत्या मद्यपींमुळे महिलांना चालणे असुरक्षित वाटू लागले आहे. कारवाईबाबत आळंदी पोलीस म्हणतात की, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काम आहे. तर मग दारूच्या ठिकाणी स्थानिक पोलीस हप्ते का घेतात? असा प्रश्न
सर्वसामान्यांना पडतो.
मुळात हातभट्टी व्यावसायिक आणि पोलिसांचे साटेलोटे असल्याने आळंदीतच सहा ते सात ठिकाणी अवैधपणे दारू विक्री होते. पोलीस ठाण्याच्या आवारात अवघ्या 100 मीटरवर दारूचे चार धंदे खुलेआम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चावडी चौकात सुरू आहे. हनुमानवाडी, मरकळ, चिंबळी, कोयाळी, धानोरे याठिकाणी सर्रास हातभट्टी विक्री सुरू आहे. याचबरोबर देशी-विदेशी दारूची विनापरवाना विक्री होते. चिंबळी, गोलेगाव, धानोरे या ठिकाणी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात निर्माण करून विकली जाते. हातभट्टीच्या जीवावर जागा विकत घेऊन काहींनी बंगलेही बांधले. चारचाकी गाड्या फिरवू लागले. त्यांचेच अनुकरण आता इतर करू लागले.
दारूबरोबर गांजाही विक्री
आळंदीत लग्नांची संख्या जास्त असल्याने दारूला मागणी आहे. मरकळमधे औद्योगिक भाग असल्याने सुमारे दहापेक्षा अधिक ठिकाणे आहेत, जेथे दारू विकली जाते. आता नव्याने केळगाव, हनुमानवाडी येथे झालेल्या हॉटेलमध्ये दारू विकली जाते. तर वडगाव रस्त्यावर घुंडरे गल्लीत दारूबरोबर गांजाही विक्री होते. पोलिसांच्या समोरच दारूसाठीचा कच्चा गुळाची विक्री केली जाते; मात्र पोलीस भागीदार असल्याप्रमाणे वागत असल्याने आळंदी आणि परिसरात दारूची निर्मिती आणि विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मटका, अवैध लॉजमध्येही वाढ
मटका आणि अवैध लॉजमध्येही वाढ झाली आहे. पोस्ट कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्यालगत, देहूफाट्याबरोबर आता हनुमानवाडीतही चार ते पाच लॉज नव्याने झाले. देहूफाटा मटका, ऑनलाइन लॉटरीमुळे गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. एमआयटीसारखे महाविद्यालय जवळ असूनही त्याच्या मागे पुढे दोन मटके धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने भर नागरीवस्तीत सुरू आहे. अवैध व्यवसायातून हप्त्याच्या रूपाने गलेलठ्ठ पैसे मिळत असल्याने पोलिसांचे आळंदीत नोकरी करताना सोने झाले. आळंदीसारखे तीर्थक्षेत्र अवैध धंदेमुक्त कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.