मुंबई – शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, ईडी ज्यांचे आदेश पाळत आहेत. त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणत्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हे सत्ताधाऱ्यांची चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई केली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये, असेही संजय राऊत यांनी भाजपला सुनावले.