लोणंद, (प्रतिनिधी)- कोणी गेले किंवा आणखी काही केले तरी आपण त्याचा विचार करायचा नाही. आपली वैचारिक भूमिका मजबूत असेल तर लोकशाहीमधे आपण त्यांना त्यांची जागा दाखवू शकतो. मनस्थिती आणि विचारधारा भक्कम असेल तर वय कधी आडवे येत नसते, असा टोला माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी वयावरून बोलणारांना लगावला.
लोणंद येथील राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज दि. 16 रोजी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, आयोजक डॉ. नितीन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. श्री. पवार म्हणाले, आगामी काळात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन नवीन पिढीला उभारी देऊन नवे नेतृत्व महाराष्ट्रामधे तयार करू, नवीन पिढीला ताकद व अधिकार देऊन ही नवीन पिढी महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकेल, या बदलणार्या इतिहासाचे तुम्ही सगळे साक्षीदार व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार रोहित पवार यांनी कृषी प्रदर्शन आयोजित करताना अडचणी आणणारांवर हल्लाबोल केला. शेतकर्यांच्या हितासाठी होणार्या कार्यक्रमाला अडचणी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तालुक्याच्या हिताच्या कार्यक्रमात वर फोन करून खोडा घातला जातोय, तुम्ही सत्तेसाठी लढता आणि आम्ही लोकांसाठी लढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. लोणंद एमआयडीसीतीतील बंद होत जाणार्या कंपन्यांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी दोघांच्या वादात एमआयडीसीतल्या कंपन्या निघून गेल्या’ असे नाव न घेता सातारा आणि फलटणच्या राजेंवर टीका केली.
त्यांना चाळीस पार करण्याचा आत्मविश्वास आहे तर त्यांनी शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी फोडली, आता काँग्रेसही कशासाठी फोडली, असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. इतर वक्त्यांनी सातार्यातील ऐतिहासिक पावसाच्या सभेचा केलेल्या ऊल्लेखाचा धागा पकडून खा. श्रीनिवास पाटील यांनी जिथं पवार आणि पाटील तिथे मतांचा पाऊस असे सांगत शरद पवारांसोबत सातार्यातील जनता कायम राहील, अशी ग्वाही दिली.
सातारा जिल्हा कायम आपल्यासोबत राहणार आहे, हिसकावून घेतलं तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष आहात, तुम्ही सांगाल तेच आमचे धोरण आणि तुम्ही बांधाल तेच आमचे तोरण’ असे सांगत डॉ. नितीन सावंत यांनी पक्षाने कुटुंबावर आघात करून शरद पवार यांना संपवण्याचा काहींनी चंग बांधला. पण शरद पवार कधी संपू शकत नाहीत. कारण शरद पवार म्हणजे एक विचार आहे, असे स्पष्ट केले.
शेतकर्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नये असे फर्मान काढणार्या छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे शरद पवार. सामाजिक न्यायासाठी लढणारे राजश्री शाहू महाराजांचा विचार म्हणजे शरद पवार. शरद पवार म्हणजे चालतं बोलता विद्यापीठ असून येथे पुरोगामी विचारांचे मावळे तयार होतात आणि म्हणून शरद पवार यांना कधी संपवणे शक्य नाही, या विचारावर ठाम राहून या विचारासाठी आपल्याला लढावं लागणार आहे, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यास सारंग पाटील, लक्ष्मण माने, सुनील माने, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, अभयसिंह जगताप, दीपक पवार, अभिजित घोरपडे, रामदास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.