दहिवडी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने आतापर्यंत अनेक आश्वासने देऊन रामोशी समाजाची फसवणूक केली आहे. आता समाजाच्या 25 संघटना एकत्र करून, समाजहिताच्या निर्णयांसाठी लढा देणार असल्याचा इशारा बेरड-बेडर रामोशी समाज संघटनेचे अध्यक्ष रामदास धनवटे यांनी दिला.
दहिवडी येथील जनजागृती अभियानात ते बोलत होते. एम. एम. मदने, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पोपटराव खोमणे, संजय जाधव, बदामाण्णा माकर, आप्पा चव्हाण, संजय चव्हाण, अनंता चव्हाण उपस्थित होते. धनवटे म्हणाले, सरकारने आतापर्यंत समाजाचा मतांसाठी वापर केला. आरक्षणासाठी अनेक आश्वासने दिली. यापुढे 25 संघटना एकत्र घेऊन, मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.
आप्पा चव्हाण म्हणाले, सरकारने रामोशी समाजाला झुलवत ठेवले आहे. आम्ही चोर, दरडखोर आहोत, या नजरेतून सरकार अजून पाहत आहे. आमच्यातील काही जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी सांगितले होते; परंतु आतापर्यंत पाच रुपयेसुद्धा दिले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
पोपटराव खोमणे म्हणाले, आरक्षणासंबंधी किंवा समाजाला एकत्र आणण्यामध्ये मागील काळात आमच्याकडूनच काही चुका झाल्या. असेल. मात्र, आता समाजहितासाठी सर्व संघटना एकत्र करून, मागण्या मान्य झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी समाजातील युवकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एम. एम. मदने म्हणाले, आपसातील हेवेदावे दूर ठेवून, समाजाच्या सर्व संघटना एकत्र येत आहेत. समाजहितासाठी एकसंध राहणे गरजेचे आहे. समाजातील युवकांनीदेखील एकत्र यावे.
भाजपला जागा दाखवून देऊ
आमचे आराध्य दैवत राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी निधी देऊ, असे आश्वासन देऊन, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमची फसवणूक केली आहे. येत्या निवडणुकीत भाजपला जागा दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.