सातारा, – छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. तब्बल 29 वर्षे मोगलांच्या कैदेत असणार्या महापराक्रमी स्त्री म्हणून इतिहासाच्या पानात नोंद असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्नुषा व संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या माहुली येथील समाधीला राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत राज्य शासनाने शुक्रवार (दि. 16) रोजी एक आदेश काढून प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव तयार केला आहे. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
राजधानी सातार्यातील संगम माहुली धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. महाराणी येसूबाई यांची समाधी माहुलीतच आहे. आजपर्यंत अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी प्रयत्न केले. सातारास्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था व संलग्न असणार्या अभ्यासकांनी इतिहासकालीन काही पत्रे व नकाशाच्या आधारे महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थाननिश्चिती केली होती.
सातार्यात 1729 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. त्यानंतरच्या काळात त्यांची घुमटी म्हणजेच समाधी माहुली येथे बांधण्यात आली, असा उल्लेख सापडतो. परंतु, पुढच्या जवळपास तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात समाधीचे स्थानदेखील विस्मृतीत गेले होते. मात्र, महाराणी येसूबाईंच्या समाधीचा शोध घेण्याचे काम काही ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी केल्याने आता या समाधीचे संर्वधन होणे गरजेचे असल्याचे अनेकांचे म्हणणे होते.
अखेर राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने दि. 16 फेब्रुवारी रोजी महाराणी येसूबाईंच्या समाधीस्थळाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे की, राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असावे असे सरकारच्या विचाराधिन होते. त्यानुसार महाराणी येसूबाई यांचे स्मारक संरक्षित करत असल्याबाबतची प्राथमिक अधिसूचना काढली आहे. याबाबत कोणाला काही हरकती असतील तर त्यांनी दोन महिन्यांच्या आत सांस्कृतिक विभागाकडे त्या नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहुलीच्या वैभवात भर पडणार
महाराणी येसूबाई यांच्या समाधीसह अनेक धार्मिक स्थळांच्या वैभवाने, कृष्णामाईच्या संथ वाहण्याने संगम माहुली खुलली आहे. त्यात राज्य शासनाने महाराणी येसूबाई यांचे स्मारक संरक्षित करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे याठिकाणी पर्यटनाला चालना मिळून माहुलीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.