मुंबई – राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा’, असा अजब सल्ला दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची समस्या जाणून घेतली. “तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहत असते. त्यासाठी आंदोलन करावं लागणं दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलणं झालं आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटले. महाविकास आघाडीची एकजूट राहील की नाही याबाबत उद्धव ठाकरेंना विचारा. राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे. सर्व पक्ष जेपीसी मागत आहेत आणि राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. अजित पवार यांनी पंतप्रधानांनाही क्लीन चीट दिली आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.