श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीबरोबर चर्चा चालू आहे. यात शिर्डीच्या जागेबाबत आम्ही आग्रही आहोत. चर्चा फिस्कटली तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन ही जागा लढवणार असल्याचे वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी जाहीर केले.
येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात, जिल्हा महासचिव अनिल जाधव, युवा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे, तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, डॉ.जालिंदर घिगे, प्रवीण आल्हाट, दिलीप कदम, गौतम पगारे, अनिल बनसोडे, महेश पाखरे, चंद्रकांत पवार, सुनील ब्राह्मणे, अण्णासाहेब मोहन, शिवा साठे, किशोर ठोकळ, संघराज्य त्रिभुवन, संतोष चोळके, संदीप मोकळ, हरिश नारायण, पोपटराव सरोदे, पिंटू साळवे, नीलेश जगधने, शिवा साठे, ऍड अण्णासाहेब मोहन, किशोर रणपिसे, अशोकराव दिवे, महिला युवा जिल्हाध्यक्षा छायाताई दुशिंग, शोभाताई नवले, दर्शना काळे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर झालेल्या वाटाघाटी दरम्यान वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा न मिळाल्याने आम्ही 2019 ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लागलो होतो. आम्हाला त्यावेळी शिर्डी लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला 70 हजारांहून अधिक मते पडली होती.
त्यावेळी आमचा पक्ष केवळ सहा महिन्याचा नवीनच पक्ष असतानाही 70 हजारांहून जास्त मते आम्ही मिळवली होती. आता तर गेल्या पाच वर्षापासून आमचा कार्यकर्ता गावागावांत जावून तळागाळातील माणसापर्यंत पोहचला आहे. आमच्या कार्यकर्त्याने वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजावून सांगितली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा जो उमेदवार असेल तो चांगल्या मताने विजयी होणार आहे.
या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा चालू आहे. शिर्डीच्या जागेचा समावेश आहे. आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. महायुतीचा पराभव करायचा असेल तर महाआघाडी बरोबर युती करणे गरजेचे आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.