पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे पाण्याच्या डबक्यामध्ये मृतदेह सापडले. पाण्यात खेळताना त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप बहादूर आवजी (वय ९) आणि जीवन खम्म तिखात्री (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मृतदेह सन ब्राइट स्कूल गायमुख चौक आंबेगाव बुद्रुक येथे एका पाण्याच्या डबक्यामध्ये सापडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोघे चुलत भावंडे आहेत. ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी दि. ३ मार्चला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंदवली होती. काही ठिकाणी सीसीटव्हीमध्ये ते दोघे रस्त्याने आंबेगाव बुद्रुक येथे जाताना दिसत होते. मात्र, पुढे सीसीटीव्ही नसल्याने त्यांचा माग लागत नव्हता.
दरम्यान, चार दिवसांनी एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन डबक्यामध्ये दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याची खबर दिली. भारती विद्यापीठ पोलीसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेलीच ही मुले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले, त्यांचे पालक मुळचे नेपाळचे आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.