मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. इथल्या विविध तालुक्यांमध्ये जाऊन ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मोठे वक्तव्य केले आहे. कुणी तुमच्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या. त्यांनी हात उचलला तर तुमच्याकडूनही हात उचललाच पाहिजे. मी वकिलांची फौज उभी करतो, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
रत्नागिरीत कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी, “जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी तीन सभा घेणार आहे. मुंबई, कुडाळ आणि चिपळून येथे या तीन सभा होणार आहेत. हा संपूर्ण दौरा पक्षाची घट्ट बांधणी करण्यासाठी होता. कोकणातले आपले कोकणवासीय आणि मुंबईस्थित कोकणवासीय यांच्यात मिलाप व्हावा, हा कोकण दौऱ्याचा हेतू होता.”असे म्हटले आहे.
“मुंबईत गेल्यावर माझ्या काही बैठका होतील. पक्ष जितका घट्ट बांधता येईल, तितका घट्ट बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो. लवकरच तुमच्यापर्यंत काही कार्यक्रम येतील, हे कार्यक्रम राबवत असताना कुणाचीही पर्वा करू नका. कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या. मी वकिलांची फौज उभी करेन. हे मी तुम्हाला मुद्दामहून आताच सांगतोय,” असेही राज ठाकरेंनी नमूद केले आहे.
राज ठाकरे पुढे बोलताना, “समोरचे जसे वागतील, तसंच आपण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपल्याकडूनही हातच उचलला गेला पाहिजे. आणखी ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मी उघडपणे बोलू शकत नाही. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत बोलेन.” असे म्हणाले.