मुंबई : राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद तब्बल चार वर्षांनंतर काँग्रेसकडे आले आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडकडून वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचे हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवलं. त्यामुळे आमदारांच समर्थन लक्षात घ्यायच की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातले आहेत आणि विरोधी पक्षनेते देखील विदर्भातील आहे. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद एकाच समाजातून देत हे ही सामाजिक समीकरण निर्णय घेताना काँग्रेस समोर ठेवल्याचे पाहायला मिळते. विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होत आहे.